नगर – शहराच्या नवीपेठमधील जय आनंद महावीर युवक मंडळाची ही महाअन्नदानाची सेवा मी गेल्या अनेक वर्षांपासून पहात आली आहे. भुकेलेल्यांना अन्न देण्याची शिकवण आनंदऋषिजींनी दिली. त्याप्रमाणे हे मंडळ गोरगरीब, कष्टकरी, गरजू, वृध्द, निराधार, अपंग यांच्यासह हजारो भाविकांना दर्जदार भोजन देत आहे. मंडळाचे हे कार्य प्रशंसनीय
आहे, असे अ.ए.सो.च्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी सांगितले.
मानवसेवेलाच ईश्वरसेवा मानून सर्वांना संस्कारांची शिदोरी देणार्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाने सालाबादप्रमाणे यंदाही अन्नदान (महाभोजन) कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी महावीर कन्स्ट्रशन्सचे राजेश भंडारी, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, ग्राहक भांडारचे चेअरमन विक्रम फिरोदिया, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, उद्योजक दिपक कासवा, मोहनलाल मानधना, जितेंद्र बिहाणी, सचिन भंडारी, सचिन मुनोत, नेवासकर परिवारातील
ज्येष्ठ शरद मुनोत, मिनाताई मुनोत यांच्यासह मर्चन्टस् बॅकेतील संचालक उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले, आचार्य आनंदऋषीजी महाराजांच्या शिकवणुकीप्रमाणे जय आनंद महावीर युवक मंडळाने ३० वर्षांपूर्वी अन्नदानाचा उपक्रम सुरू केला. दरवर्षी अनेकांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला जातो. पुरीभाजी, बुंदी, मसालेभात असा स्वादिष्ट मेनू असतो. वयोवृध्द, अपंगांना खाली मांडी घालून भोजन करताना त्रास होतो हे लक्षात घेवून भोजनासाठी टेबल खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात येते. संपूर्ण स्वयंपाक हायजिन पध्दतीने स्वच्छता राखून आचारी पवन खंडेलवाल हे महाप्रसाद तयार करतात. बाबावाडी, स्नेहालय, अनामप्रेम, मूकबधीर
विद्यालय यांच्यासह अनेक संस्थांना भोजन पाठवले जाते. हजारो लोक या महाअन्नदानाचा लाभ घेतात. शिवसेनेचे विक्रम राठोड यांनी मंडळाचा हा उपक्रम म्हणजे संतांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून केलेली महान समाजसेवाच होय, असे सांगितले. मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा यांनी स्वागत करताना या कार्यक्रमासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते
तब्बल महिनाभर परिश्रम घेतात, असे सांगितले. बाबालाल गांधी यांनी आभार मानताना स्व.योगेश (गुड्डू) मुनोत
यांच्या स्मृतींना उजाळा दिला असता उपस्थितांचे डोळे पाणावले. नवीपेठमध्ये प्रशस्त मंडपात सुरू झालेल्या
भोजन प्रसादाच्या पंगती सामाजिक समरसतेचे आणि सर्वधर्मियाच्या एकतेचे दर्शन घडवणार्या ठरल्या.














