तुम्ही-आम्ही रामराज्य निर्माण करावे म्हणून प्रभू श्रीरामच वाट पहाताहेत : शंकर महाराज शेवाळे यांचे प्रतिपादन
नगर – तुम्ही-आम्ही रामराज्य निर्माण करावे म्हणून प्रभू श्रीरामच वाट पहात आहेत. तीर्थंकरानंतर तीर्थंकर झाले नाहीत. रामदास स्वामी, ज्ञानेश्वर, तुकोबा, शिवाजी महाराज परत झाले नाहीत. रामराज्य निर्माण करण्यास प्रभू श्रीराम परत येणार नाहीत तर त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्यालाच रामराज्य निर्माण करावे लागणार आहे, असे प्रतिपादन शंकर महाराज शेवाळे यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या भगवान महावीर व्याख्यान- मालेचे समारोपाचे पुष्प ’थोडं जगणं समाजासाठी’ या विषयावर गुंफताना आनंदधाममध्ये ते बोलत होते. सौ.मनिषा लोढा व सुदर्शन लोढा या माय-लेकांच्या हस्ते वत्यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानमाला सुरू झाल्यापासून वृत्तपत्र प्रसिध्दीची सेवा निरपेक्षपणे करणारे पत्रकार मिलिंद महाराज चवंडके यांना शंकर महाराज शेवाळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सौ.मनिषा लोढा यांना जैन सोशल फेडरेशनच्यावतीने डॉ.प्रकाश कांकरिया, सुरेश कटारिया व दिलीप गुगळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सौ.सरोजताई कटारिया यांनी सूत्रसंचालन केले.
श्री.शेवाळे पुढे म्हणाले, माणसांची खुप गर्दी झालीय या गर्दीतला माणूस शोधण्याची वेळ आलीय. डॉटर मंडळी आपल्याला समजणार नाही अशा लिपीत मेडिकलवाल्यास लिहितात की, मी लुटले तूही लुट! अशी परिस्थिती आहे. सर्वस्वाचा त्याग करून एकभुक्त रहात समाजासाठी जगा. पायाखाली मुंगीही मरू नये, याचा विचार करणारी आपली संस्कृती आहे, याचा विसर पडू देवू नका. नवकार महामंत्राचा जप करत जे समाजासाठी जगले त्यांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र
दरवळतो आहे. आपण कोठून आलो? आपल्याला कोठे जायचे? याचे आत्मचिंतन करा. आनंदऋषिजींनी दाखवलेल्या मार्गाने गेलात तर जीवनाचे सार्थक होईल. आज झोपेच्या गोळ्या न खाता झोपणारा आणि घड्याळाचा अलाराम न लावता उठणाराच सुखी आहे. आपलं जीवन तपासून पहा. पिढ्यान् पिढ्या पैसा कमावणारे पैशांचा उपभोग स्वतःसाठीही घेत नाहीत. कोट्यावधींचा खर्च करून अलिशान बंगले उभारतात पण त्यात शांतपणे जगण्याचा आनंद घेत नाहीत.
आपली मनोभूमिका बदला. संकुचित जगणं सोडा. माझी संपत्ती, माझे सौंदर्य हे बाजूला ठेवून चंदनासारखे झिजा. भुकेलेल्यांना अन्न द्या. आपले नाव आगी लावणार्यांच्या यादीत आहे की विझवणार्यांच्या यादीत ते पहा. अलिकडे कुटूंब व्यवस्था बिघडत चाललीय. एकत्र राहूनही एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. सरडा धोका पाहून रंग बदलतो तर माणूस मोका पाहून रंग बदलतो आहे. आईचे दूध पोषण आहार आहे हे सरकारला सांगावे लागते कारण सुशिक्षित आईला कळत नाही, अशी आई मुलं काय घडवणार? आपणं टॉयलेट-बाथरूम कसं साफ करावं, हे टिव्हीला सांगावं लागत, हे
आपल्या घराचं दुर्दैव म्हणावं लागेल. टिव्हीवरील सगळ्या जाहिराती फसव्या असतात. मोबाईलमुळे आपले डोळे निकामी होत चालले कर्णबधीरता वाढत चालली, हे कुठेतरी थांबवा. आपणं स्वतःसाठी आणि समाजासाठी जगणं विसरत चाललो
आहोत. माझं ते माझंच आणि दुसर्याचंही माझंच म्हणणारांनी आपण किती दिवस जगणार? याचा गंभीरतेने विचार करावा. आपली चिता पेटण्यापूर्वीच आपल्यातील चेतना जागृत करा. मृत्यू होण्याअगोदर थोडं स्वतः साठी थोडं इतरांसाठी जगा, अस सांगताना श्री.शेवाळे यांनी दिलेली विविध उदाहरणे उपस्थितांना आत्मचिंतन करायला लावणारी ठरली. व्याख्यानमालेच्या समारोप सोहळ्यास शहरासह उपनगरातील स्त्री-पुरूष उपस्थित होते. युवतींची संख्या लक्षणीय होती. सीमा मुनोत यांनी आभार मानले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी सपना कटारीया, सिमरन मुनोत, प्रतिक संचेती आदींनी
परिश्रम घेतले