शहरातील बाजारपेठेत दुकानांसमोरच साचलेत कचऱ्याचे मोठ-मोठे ‘ढिगारे’

0
29

नगर – शहरातील बाजारपेठांमध्ये सध्या कचर्‍याचे मोठ्या प्रमाणात ढिगारे साचले असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. घंटागाड्यांचे चालक आपल्या सोयीनुसार कचर्‍याचे संकलन करत असल्याने काही भागात दिवसभर कचरा पडून राहतो. विशेषतः बाजारपेठेत दुकाने सुरू होण्यापूर्वी कचरा उचलला जात नसल्याने व्यापारी, व्यावसायिकांसह ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रामचंद्र खुंट येथे ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिगारे साचले असून मागील काही दिवसांपासून ते कचरा वाहतूक करणार्‍या संस्थेकडून उचलले गेले नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. या ढिगार्‍यांवर मोकाट जनावरे फिरत असल्याने त्यांच्या मलमुत्रामुळे या कचर्‍याचा कुबट वास सुटला आहे. शहरात सफाई कर्मचार्‍यांमार्फत दैनंदिन सफाईचे कामकाज केले जाते. झाडलोट करून रस्ते, गल्लीबोळातील कचर्‍याचे ठिकठिकाणी संकलन केले जाते. सदर कचर्‍याचे ढिगारे घंटागाडी, ट्रॅटरच्या माध्यमातून उचलले जातात. परंतु रामचंद्र खुंट परिसरात मागील चार-सहा दिवसांपासून जमा केलेल्या कचर्‍याचे ढिगारे तसेच पडलेले असून, मोकाट जनावरांमुळे सदरचा कचरा रस्त्यावर पसरला जात आहे.

व्यापारी व्यावसायिकांसह नागरिकही त्रस्त, महापालिका प्रशासन व ठेकेदार संस्थेचे दुर्लक्ष

या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता पसरल्याने व्यापारी व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. महापालिका तसेच घंटागाडी चालकांना वारंवार फोन करून अथवा प्रत्यक्ष भेटून विनंती केल्यानंतरही कचर्‍याचे ढिगारे उचलले जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही आडतेबाजार या गजबजलेल्या बाजारपेठेत ठिकठिकाणी साचलेले कचर्‍याचे ढिगारे दुपारी उशिरापर्यंत तसेच पडून राहात असल्याने तेथील व्यापारी व्यावसायिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. परंतु याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. प्रशासन नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचेच यातून दिसून येते. या कचर्‍याच्या ढिगार्‍यांमध्ये प्लॅस्टिक, कागद तसेच ओला कचरा आणि काहीवेळा मेलेल्या प्राण्यांचे अवशेषही असतात. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता, घाण पसरते. तसेच दुर्गंधीही सुटते. त्यामुळे दुकानात येणारे ग्राहकही त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन बाजार पेठेतील कचरा संकलन लवकर करून तो उचलण्याबाबत संबंधित ठेकेदार संस्था आणि घंटागाडी, कचरा वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना सूचना कराव्यात, अशी मागणी बाजारपेठेतून होत आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशाचीही प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही

मध्यंतरी शहरातील कचर्‍याच्या ढिगार्‍यांबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.