मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
69

घोडा आणि म्हातारा 

एका गावात एक म्हातारा आपल्या मुलांसोबत राहात होता. त्यांनी एक घोडाही पाळला होता. पुढे काही दिवसांनी घोडा विकून टाकावा, असे वाटल्याने म्हातारा व त्याचा मुलगा घोडा विकण्यासाठी बाजाराच्या रस्त्याने चालले होते. काही अंतर गेल्यानंतर वाटेत त्यांना एक माणूस भेटला आणि म्हणाला, “आजोबा, अहो, त्या मुलाला पायीच कशाला चालायला लावता? त्यापेक्षा त्याला घोड्यावर बसवा आणि तुम्ही लगाम धरून चालत जा.’ असे म्हणताच म्हातार्‍याने मुलाला घोड्यावर बसवले आणि स्वतः लगाम धरून पुढे चालू लागला. असे काही अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा त्यांना एक माणूस आडवा आला आणि घोड्यावर बसलेल्या मुलाला म्हणाला, “अरे आळशा, मूर्खासारखा स्वतः घोड्यावर बसलास आणि आपल्या म्हातार्‍या बापाला खुशाल चालायला लावतोस.

तुला काही शरम तरी आहे की नाही?” असे ऐकताच म्हातार्‍याने मुलाला घोड्यावरून खाली उतरवले आणि स्वतः घोड्यावर बसला आणि मुलगा लगान धरून पुढे चालू लागला. अशा प्रकारे काही अंतर जाताच वाटेतील दोन स्त्रियांचे लक्ष त्यांच्याकडे जाताच त्या बोट दाखवीत म्हणाल्या, “बिचारा मुलगा पायी चालला आहे आणि बाप बघा कसा आरामात बसून प्रवास करीत आहे! याला काही मुलाविषयी प्रेम दिसत नाही.” तसा त्या स्त्रियांचा संवाद ऐकताच म्हातार्‍याने आपल्या पाठीमागे मुलाला बसविले आणि वाट चालू लागला. काही अंतर जात नाही, तोच परत एक माणूस आडवा येत म्हणाला, “बाबा, घोडा तुमचाच आहे ना?” “हो तर, हा आमचाच आहे”. असे म्हातारा उत्तरला असता तो माणूस म्हणाला, “मला काही हे खरे वाटत नाही. हा जर तुमचाच घोडा असता, तर तुम्ही बिचार्‍याचे असे हाल केले नसते.

खुशाल दोघे आरामात त्याच्यावर बसलात. बिचारा ओझ्याने अगदी थकून गेलेला दिसतो. आता तुम्ही दोघे त्याला उचलून घ्या आणि चालू लागा.” असा सल्ला मिळताच दोघे बापलेक घोड्यावरून खाली उतरले. मग त्यांनी घोड्याला जमिनीवर आडवे पाडून त्याचे पाय दोरीने बांधून त्यात एक जाडजूड वेळू अडकवला आणि ते घोड्याचे धूड खांद्यावर घेऊन ते पुढे चालू लागले असता हे अजब दृश्य पाहून सर्व लोक त्यांच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसू लागले. काही लोक टाळ्या वाजवू लागले. हा कोलाहल ऐकून घोडा बिथरला. त्याने पायांना हिसके देत दोर तोडला. पायाचे दोर तुटताच घोडा खाली वाहत असलेल्या नदीत पडला आणि बुडून मेला.

तात्पर्य : एखादे काम करीत असता जो तो वेगवेगळ्या सूचना देत असतो. त्यावेळी योग्य- अयोग्य हे आपल्या मनाशी ठरवून वर्तन करावे.