महायुतीतील अंतर्गत टोळी युद्ध शहरातील दहशतीचे ओंगळवाणे प्रदर्शन : किरण काळे

0
61

 

नगर – लोकसभा निवडणूक मतदानाच्या आदल्या दिवशीच महायुतीतील दोन घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावर काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जोरदार तोफ डागली आहे. महायुतीतील अंतर्गत टोळी युद्ध शहरातील दहशतीच ओंगळवाणं प्रदर्शन करणार असल्याची टीका त्यांनी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख सचिन जाधव, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आ. जगताप यांचे कार्यकर्त्यांचे गट आपापसात भिडले. जाधव यांना उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर बोलताना किरण काळे म्हणाले, विद्यमान भाजप उमेदवारांनी मागच्या निवडणुकीवेळी नगरकरांना जाहीर शब्द दिला होता की मी नगर शहरातील गुंडगिरी संपवेल. केडगावमध्ये घर घेईल. शहर दहशतमुक्त करेल. मात्र दहशत करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले. आज त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीतून टोळी युद्ध सुरू झाली आहेत. दहशत, गुंडगिरी करत राजरोसपणे रस्त्यावर राडेबाजी सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिक मात्र भयभीत झाला आहे. आमचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर खोटे नाटे बनाव रचून गुंडगिरीचे, दहशतीचे खोटे आरोप केले गेले. त्याचा भांडाफोड झालेला आहे. सत्य जनतेसमोर आलेले आहे. आता मात्र विखे समर्थक असणार्‍या दोन गटांमध्ये आपापसात एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत घटना सुरू झाल्या आहेत. गुन्हेगारांच संघटन केल्यानंतर अशाच बाबी घडणार. त्यात नवल नाही. मतदार सुज्ञ आहेत. पोलीस प्रशासनाने भयमुक्त वातावरण मतदारांना मतदानासाठी करून द्यावं. चोख बंदोबस्त ठेवावा. मतदारांनी देखील गुंडगिरीला मूठ माती देण्याचा विडा उचललेल्या निलेश लंके यांच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्वाला बळ द्यावं. यापूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या घटनांमधून हत्याकांड घडली आहेत. महायुती राजकीयदृष्ट्या आमची विरोधक जरी असली तरी देखील अशा प्रकारची टोळी युद्ध होऊ नयेत. सगळ्यांच्या मागे परिवाराची जबाबदारी आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. कुणाचा जीव जाईल इथपर्यंत बाबी जाऊ नयेत, असा आमचा अहिंसावादी विचार असल्याचे काळे यावेळी म्हणाले.