LATEST ARTICLES

महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशनचे विविध मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘धरणे आंदोलन’

नगर – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००५ साली वित्तीय समावेशकतेचा पुढाकार घेतला याला २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन हे नाव देऊन या योजनेला आपल्या सरकारची प्राथमिकता बनवली. हा पुढाकार राबविण्यासाठी बँकांच्या शाखांचे जाळे पुरेसे नव्हते. त्यातच सरकारने ही आपली प्राथमिकता बनवल्यानंतर तर खूपच वेगाने खाती उघडली गेली. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने, बँकेच्या शाखेला पर्याय म्हणून बँकिंग करस्पाँडंट एका नव्या यंत्रणेला जन्म दिला ज्या द्वारे नवीन खाती उघडली जातील, पैसे भरणे, पैसे काढणे एका मर्यादेपर्यंतचे व्यवहार केले जातील, तर जस जशी जनधन खात्याची संख्या वाढू लागली तसतसे बँक मित्रांची संख्या देखील वाढू लागली. त्यांच्या कामाची व्याप्ती वाढू लागली आणि मग त्यांचे संचालन, व्यवस्थापन करणे बँकांना कठीण जाऊ लागले. यातूनच बँक आणि बँक मित्र यांच्यातील मध्यस्थ सर्विस प्रोव्हायडर आले, आणि बँकांनी ए बन मित्रांची जबाबदारी झटकवली. आज देशात १३.५५ लाख बँक मित्र काम करत आहेत तर सर्व्हिस प्रोव्हायडर ९३५ आहेत. ते ५५.२२ कोटी जन धन खातेदारांनासेवा देत आहेत. जी खाती उघडण्यात आणि त्यांना सेवा देण्यात बँक मित्रांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. आज समाजातील वंचित घटकांना सेवा देण्यात बँक मित्र आधारस्तंभची भूमिका बजावत आहेत पण दुर्दैवाने ते स्वतः मात्र दुर्लक्षित झाले आहेत. त्यांना नियुक्तीपत्र नाही, रजा नाहीत, मेडिकल नाही, सेवेत सुरक्षितता नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष बँका त्यांची नेमणूक करत होत्या तोपर्यंत त्यांना मिळणारा कमिशनचा दर समाधानकारक होता पण आता सर्विस प्रोव्हायडर आल्यानंतर कमिशनचा दर कमी झाला आहे. त्यांना सेवेत सुरक्षितता नाही. निर्धारित सेवाशर्ती नाहीत. बँक मित्रांना निर्धारित सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात. बँक आणि बँक मित्र यातील मध्यस्त यांना दूर सारले जावे. बँक मित्रांना किमान मेहनताना दिला जावा ज्यासाठी त्यांच्याकडून किमान निर्धारित काम करून घेतले जावे व व्यवहारासाठी योग्य त्या दराने कमिशन दिले जावे. यात निर्धारित काळानंतर योग्य ती वाढ करण्यात यावी. बँक मित्रांच्या नेमणुका भौगोलिक सीमा, खात्यांची संख्या, व्यवहार या निकषावर केल्या जाव्यात. बँक मित्र देत असलेल्या सेवांसाठी जागा, वापरत असलेला डाटा, स्टेशनरी, वाहन खर्च याची भरपाई देण्यात यावी. बँक मित्र करत असलेले कार्यालयीन कामकाज यात कायदेशीर किंवा अर्ध कायदेशीर (टणअडख ङएॠअङ) विवाद निर्माण झाले तर त्याचा निपटारा करण्याची जबाबदारी बँकेने घ्यावी. बँक मित्र ते करत असलेल्या कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून पैशांची ने आण करतात. यातील जोखीम लक्षात घेता त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन पुणे यांनी पाठींबा दिला असल्याची माहिती ऑर्ग. सेक्रेटरी प्रकाश कोटा यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी निवेदन स्वीकारत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत साबळे, भूषण थोरात, नितीन चिखले आदी उपस्थित होत

दूध संघाच्या अवसायन प्रक्रियेचा आदेश होत नसल्याने उपोषण

नगर – अहमदनगर तालुका सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित या संस्थेच्या अवसायन प्रक्रियेला १७ महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही अंतिम आदेश  न झाल्यामुळे कर्मचार्‍यांच्या वतीने विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक येथील कार्यालयासमोर साखळी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. तर सर्वप्रथम कर्मचार्‍यांच्या देणग्यांचे निवारण करण्याची मागणी  उपोषणकर्त्यांनी केली आहे. १ मे महाराष्ट्र दिनापासून तायगा शिंदे व गजानन खरपुडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या उपोषणात कुंडलिक देवकर, दत्तात्रय बेकारसे, अशोक डहाने, आप्पासाहेब ढवळे, अशोक धनगर, बाबजी शिंदे, भाऊसाहेब पळसकर, रमेश वायकर, बाबासाहेब चतुर, संभाजी निमसे, कोंडीभाऊ शेळके, बाळासाहेब थोरात, सुनिल निमसे, बाळासाहेब बेरड सहभागी झाले होते. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक विभाग यांनी संघाला अवसायनात घेतल्याचे अंतरिम आदेश काढले होते. मात्र, कायद्यानुसार एक महिन्याच्या आत अंतिम आदेश अपेक्षित असतानाही आजतागायत तो आदेश न झाल्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये असंतोष पसरला आहे. सदर निर्णयात माजी संचालक मंडळाने संघाचे आर्थिक नुकसान केल्याचे पुरावे असूनही त्यांच्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. उलट, त्यांच्या पाठीशी राजकीय पाठबळ असल्याचा गंभीर आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, सध्याचे प्रभारी कार्यकारी संचालक माजी संचालक मंडळाच्या संपर्कात राहून कारवाईस विलंब लावत आहेत. देणी आणि प्रॉव्हिडंट फंड मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कार्यालयाकडून देण्यात येत नाहीत. एवढेच नव्हे, तर कार्यालयाकडून योग्य माहिती देण्यासही टाळाटाळ होत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कर्मचार्‍यांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळत नसून, ही बाब अन्यायकारक आहे. न्यायालय किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडून स्थगिती आदेश नसताना, अवसायनाचे अंतिम आदेश प्रलंबित ठेवणे हा राजकीय हस्तक्षेप असल्याचा ठपका कर्मचार्‍यांनी ठेवला आहे. यामुळे संघातील कर्मचार्‍यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे.

अरुणकाका जगताप यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नगर – विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून दोन वेळा आमदारकी भूषवलेले अरुणकाका जगताप यांच्या पार्थिवावर २ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नगरच्या अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो काका प्रेमींनी साश्रू नयनांनी शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रातील हजारो नागरिक उपस्थित होते. राज्य शासनाच्यावतीने क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसिलदार संजय शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलिसांनी शोक धून वाजवल्यावर बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. मागील सुमारे महिनाभरापासून आजारपणामुळे अरुणकाका जगताप यांच्यावर पुण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २ मे रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर दुपारी त्यांचे पार्थिव भवानीनगर येथील घरी आणण्यात आले. यावेळी अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी चारच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘अरुणकाका अमर रहे…’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. गुणे आयुर्वे द महाविद्यालयात काही काळ पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास अमरधाम मध्ये अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी अमरधाम मध्ये मोठी गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या शोक सभेत अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांनी त्यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

आनंदधामच्या प्रांगणात आनंद बाल संस्कार शिबीराला प्रतिसाद

नगर – मुलांवर योग्य वयात चांगले संस्कार केल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होवून ते भविष्यात आदर्श बनू शकतात. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या आशिर्वादाने आणि प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने अशीच आदर्श, सुसंस्कारीत पिढी घडविण्यासाठी जैन धार्मिक परीक्षा बोर्डच्यावतीने १ मे पासून आनंद बाल संस्कार शिबिराला प्रारंभ झाला आहे. ६ मे पर्यंत आनंदधामच्या पवित्र प्रांगणात हे शिबिर होणार आहे. सकाळी ७ ते ११ यावेळेत होणार्‍या या शिबिरात जवळपास ६०० मुले-मुली सहभागी झाली आहेतन. आनंदधामचे पवित्र प्रांगण मुला-मुलींच्या किलबिलाटाने गजबजून गेल्याचे पहायला मिळाले. शिबिरात जैन साधू साध्वींच्या सान्निध्यात मुलांवर धार्मिक संस्कार केले जात असून महान परंपरा असलेल्या जैन धर्माचे मर्म मुलांना अतिशय साध्याय्सोप्या भाषेत शिकवले जात आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात एकत्र आल्यावर सामूहिक प्रार्थनेने शिबिराचे सत्र सुरु होते. विपुलदर्शनाजी, उदयप्रभाजी, आराधनाजी, पुष्पकंवरजी, विचक्षणाजी, अमितज्योतीजी, विभक्तीजी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना संस्कारीत केले जाते आहे. शिबिरात दररोज प्रार्थना, योग प्राणायाम, मेडिटेशन, सामायिक, चौवीसी पठण, गुरूदेवांचे सचित्र चरित्र, मंत्र, मांगलिक असे धडे दिले जातात. याशिवाय स्तोत्र पठण, एरोबिस, व्यक्तीमत्व विकास, सामाजिक जागृतीवर प्रबोधन केले जाते. मुलांना दररोज पौष्टिक नाश्ता दिला जातो. युकेजी ते दहावी पर्यंतची मुले मुली यात सहभागी झाले आहेत. दररोजच्या शिबिराच्या सांगते प्रसंगी महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा., प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी म.सा., आलोकऋषीजी म.सा. यांच्याकडून जैन धार्मिक गीते व मार्गदर्शनाने आणि मांगलिक देऊन होते. मागील ४० वर्षांपासून उन्हाळ्याची सुट्टी आणि आनंदधाम येथील संस्कार शिबिर असे समीकरण रूढ झाले आहे. सरोज कटारिया, सपना कटारिया, सिमरन मुनोत यांच्यासह आनंद संस्कार शिक्षा अभियानाच्या शिक्षिका, ब्राम्ही युवती मंचच्या सदस्या शिबिराची नियोजन व्यवस्था पाहत आहेत.

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा

नगर – अथक परिश्रम व चिकाटी तसेच उत्कृष्ठ मार्गदर्शन मिळाल्यानेच खेडेगांव असुनही अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परिक्षांमध्ये सुयश संपादन केले. खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागात ठासुन भरलेली आहे याची प्रचिती नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत दिसली. एक मेंढपाळ देखील प्रखर इच्छा शक्तीने अभ्यास करुन नेत्रदिपक यश मिळवु शकतो. संविधानाने देखील प्रत्येक मुलास शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. पारनेर तालुयातील खडकवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रयत्न इंग्लिश मिडीयम स्कुल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथील गुणपत्रिका वितरण समारंभ पालक विद्यार्थी मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन अ‍ॅड. सुनिल मुंदडा यांनी प्रतिपादन केले. प्रारंभी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक, गावकरी व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे सचिव डॉ. अशोक दळवी यांनी प्रास्ताविक केले आणि संस्थेच्या प्रगतीचा व भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी होणार्‍या सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे आयोजित पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कु. आश्लेषा वाबळे, चि. ऋतुराज जाधव व कु. सृष्टी गागरे या विद्यार्थ्यांचा  लकांसमवेत सत्कार करण्यात आला. चालु शैक्षणिक वर्षात सुयश मिळविलेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले यावेळी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या व शिक्षकांच्या विषयी ऋण व्यक्त करणारे मनोगत सांगितले. या कार्यक्रमासाठी अहमदनगर येथील विनित ग्राफीसचे संचालक सागर फुलसौंदर, सरपंच संतोष मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण वाबळे, डॉ. सचिन जाधव, सोमनाथ मुसळे, बाबासाहेब काळे, संतोष मुसळे, दिलीप मोरे व आजुबाजुच्या परिसरातील अनेक नागरीक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक संदिप खैरे यांनी केले आणि मुख्याध्यापक उषा दळवी यांनी आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

४१५ वर्षितप तपस्वींच्या अविस्मरणीय पारणा महोत्सवानिमित्त आनंद तीर्थ येथे भाविकांची गर्दी

नगर – राष्ट्रसंत आचार्य भगवंत गुरुदेव श्री आनंदऋषीजी म. सा. १२५ वी जन्मजयंती निमित्त ३० साधु-साध्वीजी आणि ७५०० हून अधिक भाविक आणि भक्तांच्या उपस्थितीत ४१५ वर्षितप तपस्वींचा वर्षितप पारणा महोत्सव उत्साहात झाला. आचार्य भगवंत आनंदऋषीजी महाराजांच्या पवित्र जन्मस्थान असलेल्या चिचोंडी येथे आनंदतीर्थाच्या पवित्र क्षेत्रात शाही पारणा महोत्सव उत्साहात पार पडला. या विशाल आणि भव्य प्रांगणात सर्वत्र अनुमोदनेचे स्वर गुंजित राहिले. अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय भगवंत प्रवीणऋषीजी म.सा.च्या सत्प्रेरणेतून २०१३ पासुन वर्षितप पारणा महोत्सवाची चिचोंडी येथे सुरूवात झाली. यंदाच्या पारणा महोत्सवात उपाध्याय भगवंत प्रवीणऋषीजी म.सा. आदि ठाणे २, तरुण तपस्वी मुकेशमुनीजी म.सा. आदि ठाणे, महासती कांचन कंवरजी म.सा. आदि ठाणे, महासती सुनंदाजी म.सा. आदि ठाणे, महासती आदर्श ज्योतीजी म सा., आदि ठाणे, महासती सुप्रियाजी म.सा.आदि ठाणे महासती ओजसदर्शनजी म सा. आदि ठाणे अशा एकूण २७ गुरु भगवानांची पवित्र उपस्थिती आणि आशीर्वाद सर्व तपस्वी आणि गुरुभक्तांना मिळाला. सर्व गुरु भगवानांनी तपस्वींच्या मान्यतेने अक्षय्यतृतीयेचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले. त्यांनी सांगितले की, या देशात कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि राष्ट्रीय व्यवस्था प्रथम भगवान ऋषभदेव यांनी स्थापित केली होती. भगवान ऋषभदेव हे केवळ इतिहासाचे गायक नव्हते तर इतिहासाचे निर्माते देखील होते. जेव्हा समजावून सांगूनही दुर्जनांनी ऐकले नाही, तेव्हा त्यांना शस्त्रांची भाषा शिकवणारे भगवान ऋषभदेव होते. भारताला हे नाव ऋषभदेवांमुळे मिळाले, पण आज आपण त्याचा अभिमान बाळगायला विसरलो आहोत. उपाध्याय भगवंत यांनी भगवान ऋषभदेव यांच्या जीवनाचे अचूक वर्णन केले. वर्षितप पारणा महोत्सवाच्या लाभार्थी, परम गुरु भक्त श्रीमती ज्योत्स्नाताई रतिलाल मुथा, कु. नीलम राहुलकुमार मुथा आणि मुथा परिवार (निगडी प्राधिकरण) यांनी सर्वांची श्रद्धेने, भक्तीभावाने आणि अंतःकरणाने पारणा सेवा केली. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि भावनेने संपूर्ण वातावरण भक्तीने भरून गेले. त्यांना गुरु आनंद फाउंडेशनकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आनंद तीर्थाच्या बांधकामात योगदान देणार्‍या सर्व देणगीदारांचा गुरु आनंद फाउंडेशनने सन्मान केला. गुरु आनंद फाउंडेशन आणि ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष सतीश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील १०० हून अधिक सक्रिय कार्यकर्त्यांचा त्यांच्या परिश्रम, समर्पण आणि आनंदतीर्थावरील श्रद्धेबद्दल अभिनंदन करण्यात आले. या पारणा महोत्सवात, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून तसेच चेन्नई, बंगळुरू, म्हैसूर, जयपूर, जोधपूर, हैदराबाद इत्यादी प्रांतांमधून तपस्वी, गुरुभक्त आणि भक्तांनी कडक उन्हात दीर्घ प्रवास करीत महोत्सवाला हजेरी लावली आणि गुरुदेवांनी त्यांचे अभिनंदन केले.

परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित दुचाकी रॅली व शोभायात्रा

नगर – सकल ब्राह्मण समाज सेवा संस्था महासंघ व परशुराम प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने भगवान परशुराम यांच्या  जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित ऋग्वेद भवन, चितळे रोड ते रेणुका माता मंदिर, प्रोफेसर कॉलनी चौक अशी दुचाकी रॅली व रेणुका माता मंदिर ते भिस्तबाग चौक अशी पायी शोभायात्रा काढण्यात आली होती. यामध्ये सजविलेल्या अश्व रथावर भगवान परशुरामांच्या पादुका, भगवान परशुरामांची उत्सव मूर्ती व भगवान परशुरामांची सजवलेली प्रतिमा ठेवण्यात आली होती. अश्वारूढ झालेल्या ब्राह्मण भगिनी, महिला व पुरुष, ब्रह्मवृंद, सकल ब्राह्मण समाज सेवा संस्था महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोतदार, परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशपांडे, प्रभाताई भोंग, वे शा सं निसळ गुरू, अतुल शुल, श्रीया देशमुख, सार्थक भोंग, राजाभाऊ जोशी, किरण वैकर, अरुण आवटी, शिरीष देशपांडे, अशोक कुलकर्णी, अनंत कुलकर्णी, कालिंदी केसकर, सुवर्णा महापुरुष, कांचन तांबोळी यांच्यासह अनेक परशुराम भक्त, तुतारी पथक, अब्दागिरी, भालदार, चोपदार, बँड पथक, शंखनाद पथक सहभागी झाले होते. दिल्ली गेट येथून निघालेली ही मोटार सायकल रॅली बालिकाश्रम मार्गे भुतकरवाडी, लेंडकर मळा, प्रेमदान चौक मार्गे सावेडीतील रेणुका माता मंदिरात पोहोचली. भगवान परशुरामांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या स्वागतासाठी बुधवारी सायंकाळी परशुराम भक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा सडासम्मर्जन करून सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या. त्याच बरोबर भगवान परशुरामाच्या पादुका व उत्सव मूर्तीचे पूजन व औक्षण करीत भगवान परशुरामाच्या रथावर पुष्पवृष्टी व फटायांची आतिषबाजी करण्यात आली. भगवान परशुरामांचे जन्मस्थळ असलेल्या जाणापाव (इंदोर, मध्य प्रदेश) येथून भार्गव दर्शन यात्रेच्या माध्यमातून आलेल्या पादुका परशुराम भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्याच बरोबर भगवान परशुरामांची उत्सव मूर्ती व रेणुका माता यांची भेट घडविण्यात आली. रेणुकामाता मंदिर येथे अध्यक्ष मोहन कामत सर, प्रताप सर यांनी स्वागत केले. त्यानंतर रेणुका माता मंदिरापासून भिस्तबाग चौकापर्यंत पायी शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेमध्ये भगव्या साड्या परिधान केलेल्या महिला व भगवे नेहरू शर्ट व पायजमा असा वेष परिधान केलेले परशुराम भक्त, हातात भगवे झेंडे घेतलेले युवक व युवती देखील सहभागी झाल्या होत्या. तुतारीच्या निनादात, बँडच्या तालावर भगवान परशुरामांची गाणी म्हणत व जय परशुराम जय परशुराम अशा घोषणा देत ही शोभायात्रा भिस्तबाग चौकात येऊन पोहोचली. तिथे कु. रेणुकाताई निसळ यांचे प्रवचन झाले. आपल्या प्रवचनातून त्यांनी भगवान परशुरामांचे चरित्र सारांश रूपाने कथनकेले. त्यानंतर भगवान परशुरामांच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी सहकार्य करणार्‍या दानशूर व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रधान आचार्य वेदमूर्ती सिद्धेश्वर निसळ व प्रातिनिधिक स्वरूपातील परशुराम भक्तांच्या हस्ते भगवान परशुराम व श्री गणेशाची आरती करण्यात आली. कार्यक्रमास नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, सुनील त्र्यंबके, संपत नलावडे, बाळासाहेब पवार, शिवा चव्हाण, निखिल वारे, गोविंद जोशी, मनोज जोशी, प्रभावती भोंग यांच्यासह अनेक हिंदी भाषिक ब्राह्मण उपस्थित होते. कार्यक्रमात अनेक हिंदी भाषिक ब्राह्मण परिवार प्रथमच सहभागी झाले होते. राजाभाऊ पोतदार यांनी प्रास्ताविक केले. यशवंत आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय देशपांडे यांनी आभार मानले. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी राजाभाऊ पोतदार, परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशपांडे, अतुल शुल, श्रिया देशमुख, किरण वैकर, नरेंद्र श्रोत्री, शिरीष देशपांडे, अनंत कुलकर्णी, प्रभाताई भोंग, प्रमोद कुलकर्णी, योगेश दाणी व हिंदी भाषिक ब्राह्मण संस्था आदींनी परिश्रम घेतले.

फायटर जेटमधून पडलेला जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी

नगर – राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात फायटर जेट विमानामधून पडून जमिनीमध्ये सात फुटांवर रूतून बसलेला जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी करण्यात आला. यासंदर्भात खा. निलेश लंके यांनी लष्करी अधिकार्‍यांच्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. या सुचनांची दखल घेत लष्कराकडून १ मे रोजी हा बॉम्ब निकामी करण्यात आला. वरवंडी येथे फायटर जेट विमानातून हा बॉम्ब पडून जमीनीमध्ये रूतल्याने शेतकर्‍यांच्या जल वाहिन्या फुटल्या. त्यामुळे शेतांमधील पीके जळण्याची वेळ आली होती. सात दिवस उलटूनही बॉम्ब हटविण्यासंदर्भात काहीही कार्यवाही झाली नव्हती. खासदार निलेश लंके यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी स्टेशन कमांडर आणि लष्करी अधिकार्‍यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. या बैठकीत नागरीकांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे यावेळी मान्य करण्यात आले होते. १ मे रोजी लष्करी तज्ञांच्या पथकाने हा जिवंत बॉम्ब सुरक्षितपणे काढून तो आपल्या ताब्यात घेतला. हा बॉम्ब निकामी करण्यात आल्याची माहीती स्टेशन कमांडर यांनी खा. लंके यांना दिली. हा बॉम्ब निकामी करण्यात आल्याने परिसरातील शेतकर्‍यांना तसेच नागरीकांना मोठा दिलासा मिळाला असून एक संभाव्य आपत्ती टळली आहे. या घटनेनंतर लष्करी हददीतील समस्या, शैक्षणिक गरजा आणि मंदीर विकास आदी प्रश्नांवरही लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

सामाजिक संस्थांतील मुलांनी घेतला ‘आंबे खाण्याचा’ आस्वाद

निरंजन सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम, चांगल्या उपक्रमांसाठी समाज नेहमीच सहकार्य करेल – सिद्धि जौहरी नगर – अनेक संस्था समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करत आहेत. अनाथ मुला-मुलींना आधार देण्यासाठी त्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. अशा संस्थांना मदतीचा हात देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून निरंजन सेवाभावी संस्था काम करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. आज सामाजिक संस्थांतील मुलांना आंबा खाण्याची स्पर्धे चा उपक्रम राबवून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विविध उपक्रमातून मदतीचा हात दिला जातो. अशा उपक्रमामुळे त्यांचा विकास होण्यास नक्कीच मदत होणार आहे. चांगल्या उपक्रमांसाठी समाज नेहमीच सहकार्य करेल. सामाजिक संस्थांच्या उन्नत्तीसाठी प्रत्येकाने आपआपल्यापरीने वाटा उचलावा, असे प्रतिपादन मिसेस इंडिया इंटरनेशनल विजेती सिद्धि जौहरी यांनी केले. निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे सामाजिक संस्थेतील मुला- मुलींसाठी आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसुदन गांधी, प्रदेश सचिव सत्यनारायण सारडा, उद्योजक अनुराग श्रीवास्तव, सिद्धि जौहरी, दिनेश सोलानी, पुरुषोत्तम रादंट, उद्योजक जितेंद्र बिहाणी, श्रद्धा बिहाणी आदि उपस्थित होते. उद्योजक जितेंद्र बिहाणी म्हणाले की, निरंजन सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे उत्कृष्ट काम सुरु असून त्यांचा पुर्ण वर्षभराचा कार्यक्रम हा ठरलेला असतो. आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहूण आम्हाला समाधान होत असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी मधुसुदन गांधी म्हणाले की, निरंजन सेवाभावी संस्था यांचे कार्य राज्यामध्ये उत्कृष्टपणे सुरु असून या संस्थेचा कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी नाही, त्यामुळे श्रेयवाद घेण्याचा प्रश्नच नाही. सर्व एकत्र राहुन एकदिलाने काम करत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल प्रदेशचा उत्कृष्ट पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी जो उपक्रम राबविला आहे. तो खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अतुल डागा म्हणाले, निरंजन संस्थेच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. यंदाच्यावर्षी संस्थेने अनेक मुला-मुलींचे पालकत्व घेत त्यांच्या सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबरच संस्थेच्या सभासदांच्या आनंदक्षणी मिष्ठान्न भोजन अशा संस्थेतील मुलांना दिले जाते. आजही अशा सामाजिक संस्थेतील मुलांना मनसोक्त आंबे खाण्याचा आनंद मिळवून दिला असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले. मुकूंद धुत यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे स्वप्निल कुलकर्णी, निलेश बिहाणी, विशाल झंवर, अभिजित बिहाणी, राहुल झंवर, सुमित चांडक, सुहास चांडक, हरिष काबरा, संजय पूगालिया, महेश चांडक, दीपक काबरा, अर्चना पुगलिया, प्राजक्ता डागा, योगिता कुलकर्णी, पूनम चांडक, सविता झंवर, संगीता सिकची, दीपिका चांडक, जया बिहानी आदिंनी परिश्रम घेतले.

अमेझिंग अबॅकसच्या १०३ विद्यार्थ्यांचे यश

नगर – अमेझिंग अबॅकसने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये तब्बल १०३ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. मार्च महिन्यात झालेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच हॉटेल यश ग्रँड येथे खा. निलेश लंके यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी नगरसेवक योगिराज गाडे उपस्थित होते. या स्पर्धेत अहिल्यानगर, संभाजीनगर, सिल्लोड, नागपूर, मुंबई, तसेच परदेशातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. अबॅकसच्या या स्पर्धेमध्ये एकूण १०३ विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले. सार्थक गाली, अनुश्री भापकर, विनीत महादेव, नुपूर भामरे, ओम झोडगेकर, आरव माकीजा, ओवी दंडाळे, गायत्री अहिरे, शुभ्रा तरोडे, हर्ष उखाणे, अर्जुन पाटील या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. अबॅकस ही गणिताची जुनी व अत्यंत प्रभावी तंत्रशुद्ध पद्धत असून त्यामुळे कमी वेळेत गणित सोडविण्याची कला अवगत होते. त्यामुळे अबॅकसचे महत्त्व वाढत आहे. या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, नागपूर, मुंबई व अशा देशा-परदेशातील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी अबॅकसची प्रात्यक्षिके करून दाखवली. अवघड गणितांची उत्तरे अवघ्या काही सेकंदात सोडवून उपस्थित खा. लंके यांच्यासह सर्वांनाच आचंबित केले. खा. लंके यांनी अमेझिंग अबॅकसचे संचालक किरण बल्लाळ व अश्विनी बल्लाळ यांच्यासह विद्यार्थ्यांचे कौतुक केले. डिस्ट्रिट लेव्हल कॉम्पिटिशन ऑफ अमेझिंग अबॅकसच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांसोबत पालकांनी सुद्धा दहा मिनिटांचा पेपर सोडवून सहभाग नोंदवला. यावेळी योगिराज गाडे यांनी सामान्यज्ञानावर आधारित खेळही घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांना किरण बल्लाळ व अश्विनी बल्लाळ, तसेच सहशिक्षक पोटे, प्रतीक्षा भवर, कांबळी जयश्री, प्रज्ञा विभूती, डिंपल शर्मा, मीनल बल्लाळ, कांचन दंडाळे, रेवती बल्लाळ, श्रद्धा देशमुख, शिल्पा गतफने, आशा पवार, ऐश्वर्या तोरडमल, धनश्री तोरडमल यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी सोहम गाली, दुर्वांक जाधव व ईशान बल्लाळ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रतीक्षा भवर यांनी केले. किरण बल्लाळ यांनी आभार मानले.