नगररचना विभागाच्या बोगस व निष्क्रिय कारभाराचा माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरण कामास फटका

0
26

अहिल्यानगर महानगरपालिकेने दोन दिवसात एनओसी न दिल्यास तीव्र आंदोलन करणार : गणेश भोसले यांचा इशारा

नगर – गेल्या अनेक महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम मनपाच्या उदानसीतेमुळे रखडले आहे. केवळ नगररचना  भागाच्या
एका एनओसीसाठी माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणास दिरंगाई होत आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवासी, नागरिकांना बसत असून दररोज त्यांना बसची वाट बघत उन्हातान्हात उभे राहावे लागत आहे, याला महानगरपालिकेचा ढिसाळ व निष्क्रिय कारभार जबाबदार आहे. नगररचना विभागातून दोन दोन महिने फाईल पुढे सरकत नाही; साधी
एनओसी अधिकार्‍यांना देता येत नाही, हा अत्यंत निंदनीय व अक्षम्य प्रकार आहे, असा संताप व्यक्त करत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी जर मनपाने दोन दिवसात माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामास एनओसी न
दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

यावेळी काढलेल्या पत्रकात गणेश भोसले म्हणाले, अहिल्यानगर शहराचे आमदार अत्यंत तळमळीने व सतत पाठपुरावा करून नगर शहराच्या विकासासाठी कोट्यवधींची विकास निधी मंजूर करून आणत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाला व अधिकार्‍यांना या विकासकामांशी काहीही देणेघेणे नाही. आ. संग्राम जगताप यांनी
सामान्य प्रवासी नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांच्या सोयीसाठी माळीवाडा बसस्थानकाच्या
नूतनीकरणासाठी तब्बल साडेसोळा कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे अथक परिश्रमाने पाठपुरावा करून मंजूर करून आणला आहे.

माळीवाडा बसस्थानकाच्या इमारतीच्या नूतनीकरण निधी मंजूर झाल्याने बसस्थानकाची जुनी इमारत पाडण्यात आली असून, नव्या इमारतीच्या कामास त्वरित सुरवात करण्यात येणार होती. मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे व नगररचना विभागाच्या बोगस आणि निष्क्रिय कारभारामुळे माळीवाडा बसस्थानकाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे जनतेच्या विकासाच्या अपेक्षांवर आणि आमदारांच्या अथक मेहनतीवर असे पाणी फिरवणे योग्य आहे का? महानगरपालिकेची यंत्रणा जर अशीच चालणार असेल, तर मग विकासाच्या नावाखाली जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचे? मनापाच्या नगररचना विभागातील बोगस कारभार योग्य आहे का? काम न करणार्‍या अधिकार्‍यांना पाठीशी घालणे कितपत योग्य आहे? असे सवाल गणेश भोसले यांनी मनपा आयुक्तांना विचारले आहेत.
माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामास मनपाने दोन दिवसात एनओसी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माजी महापौरांनी गणेश भोसले यांनी दिला आहे.