नगर – आजच्या व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम- च्या जगातील एकही जण आपल्या अडीअडचणीत-दुःखद प्रसंगात
आपल्या जवळ बसून पाठीवर हात ठेवत आधार देत नाही की आपण हॉस्पीटलच्या आयसीयूमध्ये उपचार घेताना आपल्या काळजीने भेटायला येत नाही. आपल्यासाठी डोळ्यांत पाणी येणारे मोजकेच मित्र आणि रक्ताचे नातेवाईकच आपले असतात, या वास्तवावर प्रवचनकार प्रा.डॉ.विनोद बाबर (कराड) यांनी बोट ठेवले.
राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या भगवान महावीर व्याख्यानमालेचे पहिले
पुष्प काही तरी चुकतंय आपलं या विषयावर गुंफताना आनंदधाममध्ये ते बोलत होते. सौ.मनिषा व निखिलेंद्र
लोढा यांच्या हस्ते वक्त्यांचा सन्मान करण्यात आला. सरोजताई कटारिया यांनी सूत्रसंचालन केले. श्री. बाबर पुढे म्हणाले, आज जग जवळ आले असे म्हटले जात असले तरी एका घरात रहाणारे एकमेकांपासून दुरावत चालले आहेत. घरातील आपल्या माणसांसोबत आपलेपणाने दिलखुलास संवाद झाला पाहिजे. तो न करता आपण मोबाईलच्या आभासी जगात वावरणे पसंत करत असू तर आपणास मानसोपचार तज्ज्ञास भेटणे अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. मोबाईलचा
वापर आवश्यक कामापुरता केल्यावर मोबाईलपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. झोपताना-झोपेमधून उठताना
मोबाईल पहाणे टाळा. आपल्या घरातील लहान मुलांच्या हाती मोबाईल ठेवून तो मोबाईलशिवाय रहात नाही, हा
खोटा मोठेपणा मिरवू नका. घरातील ५० वर्षांचा नवरा तुमचं ऐकतो मग २ वर्षाचा नातू का ऐकत नाही? त्याच्या
हातातून मोबाईल काढून घेवून त्याच्याशी बोलण्यासाठी सुसंस्कार करण्यासाठी वेळ द्या. आपण कष्टाने कमावलेल्या पैशांचा आनंद घ्या. अधिक संपत्ती, अधिक बचत, अधिक गुंतवणूक करण्याच्या नादात जगायचे राहून गेले असे होवू देऊ
नका. आपल्या शब्दाने आपल्या कृतीने कुणीही दुखावले जाणार नाही याची सदैव काळजी घ्या. जर असे घडले
तर लगेच भेटून माफी मागा. माफी मागण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. आपलं जीवन कधी थांबणार हे माहिती
नसल्याने हे जग सोडून जाताना कोणाशीही वैर राहू नये, याची काळजी घेत देवाने दिलेल्या जीवनाचा
आनंद घ्या. आपले शरीर ही अनमोल संपत्ती आहे. ज्याचे शरीर उत्तम तो जगात सर्वात श्रीमंत. धाव-धाव करून
कोट्यवधीची इस्टेट कमवली तरी आपल्याला साथ फक्त शरीरच देणार हे विसरू नका. आपले आई-वडिल हेच आपले आयडॉल असले पाहिजेत. आपल्याला जन्म दिला हे सुंदर शरीर दिले. लहानाचं मोठं केलं. आपल्याला
जगवण्यासाठी अपार कष्ट घेतले तरीही आमच्यासाठी काय केलं? असं म्हणून आई-बापरूपी देवाला
कधीही दुखवू नका. भाड्याच्या घरात जीवन घालवलेल्या आई- वडिलांना बंगल्यात रहाण्याचा आनंद मिळवून द्या. माझी गाडी माझी माडी माझ्या बायकोची गोल गोल साडी या संकुचित विचारातून वेळीच बाहेर पडा. जर्मनीत
मृत्यू झाल्यावर रडण्यासाठी भाड्यानं माणसं आणावी लागतात. आपल्या मृत्यूनंतर असे होवू नये याकरिता
आपल्या मायेची माणसं मिळवा. खिशात पैसे असले तरच मैत्रीचे हात पुढे येतात, अशा मित्रांपासून दूर रहा. त्यांच्यासोबत जीवनातील वेळ वाया घालवू नका. आपली पारखं असलेल्यांसोबतच रहा. आज सर्व आजारांवर मेडिकलमध्ये औषधे मिळतात पण मनाचा आजार दूर करायला जीवाभावाचीच माणसं लागतात. ईश्वर संकट ज्यांच्या वाट्याला देतो ज्यांची
संकट पेलण्याची ताकद असते. ते येरा-गबाळ्याचं काम नाही! झोपण्यासाठी झोपेची गोळी घ्यावी लागणे ही
दुर्देवाची गोष्ट आहे. स्वतःपुरता विचार करण्याचे सोडून द्या. आयुष्य खुप सुंदर आहे जगून घ्या, असे आवाहन
श्री.बाबर यांनी केले. सिमा मुनोत यांनी आभार मानले.