तारकपूर स्थानकात एसटी बसेस येण्यास बंद

0
55

रस्त्याचे काम अर्धवट, डिएसपी चौक मार्गे बस जातात निघून; प्रवाशांची गैरसोय, धावपळ, पूर्वीप्रमाणे एसटी स्थानकात येण्यासाठी योग्य नियोजन करा

नगर – शहरातील तारकपूर रस्त्याचे काम काही महिन्यांपासून अर्धवट असल्याने तारकपूर बस स्थानकात एसटी बसेस  येण्यास बंद झाल्या असून, बस स्थानकातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर अनेक अडचणींचा सामना करुन प्रवाशांना एसटी धरावी लागत असून, तारकपूर आगार व्यवस्थापकाने पूर्वीप्रमाणे एसटी बसेस बस स्थानकात येण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे. तारकपूर रस्त्याचे काम काही महिन्यांपासून सुरु आहे. तारकपूर बस स्थानक समोरील एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, उर्वरीत बाजूचे काम प्रलंबीत आहे. मात्र वाहतुक कोंडी होत असल्याचे कारण पुढे करुन बस स्थानकात येणारे बसेस सकाळी ९ नंतर येण्याचे बंद झाल्या आहेत. मोजयाच काही बस येत असल्याने त्यासाठी प्रवाश्यांची मोठी गर्दी होत आहे. तारकपूर बस स्थानक येथून विविध कामानिमित्त गावाकडे आणि इतर शहरामध्ये जाणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहे.

गावाला आणि विविध शहरात जाणारे नागरिक तारकपूर बस स्थानकात येतात, मात्र बस येणार की नाही याची शाश्वती नसल्याने हिरमोड होवून माळीवाडा बस स्थानकाकडे वळतात. परिणामी तारकपूर येथील प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. तर काही बस आल्यास त्यामध्ये बसण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. एसटी बस गाड्या
तारकपूर बस स्थानकावर न थांबता माळीवाडा बस स्थानक किंवा पुणे बस स्थानकावर थांबून पुढे जात असल्याने बस धरण्यासाठी महिलांसह लहान मुले, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची कसरत होत आहे.
पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई आदी ठिकाणी जाणार्‍या गाड्या तारकपूर बस स्थानकात न थांबता पुढे जात आहे. यासाठी नागरिकांना डीएसपी चौकात थांबून एसटी धरण्याची वेळ येत आहे. रस्त्याचे काम दोन ते तीन महिन्यांपासून सुरु असल्याने तारकपूर बस स्थानकातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे.

माळीवाडा बस स्थानकाचे देखील नुतणीकरणाचे काम सुरु असल्याने तेथे देखील एकाचवेळी अनेक एसटी बसेस येत असल्याने जागेची कमतरता भासत आहे. हा ताण पूर्णत: स्वास्तिक चौक येथील पुणे बस स्थानकावर येत असून, कमी जागा असताना तेथे मोठ्या  प्रमाणात गर्दी होत आहे.प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाकडून
योग्य नियोजनाची गरज आहे. तारकपूर रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झालेले असताना एसटी बस गाड्यांना पूर्वीप्रमाणे तारकपूर बस स्थानकात थांबविणे आवश्यक आहे, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होणार आहे. परीक्षा कालावधी संपल्यानंतरच मोठ्या प्रमाणात सुट्ट्यामुळे एसटीला मागणी वाढणार असून याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष
देण्याची गरज आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.