१३ मे रोजी सकल जैन समाज, राजस्थानी समाज, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजवावा

0
60

नगर – सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी बसविण्याची संधी मतदारांना मिळाली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील आहेत. ते उच्च शिक्षित आणि विकासाचे व्हिजन असणारे आहेत. सकल जैन समाज, राजस्थानी समाज तसेच नगरमधील व्यापारी वर्गाने देशहित, समाजहित लक्षात घेता १३ मे रोजी आवर्जून मतदानाचा हक्क बजावत विकासासाठी भाजपला मतदान करावे, असे आवाहन कापडबाजार जैन मंदिराचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले आहे. सुभाष मुथा सुभाष मुथा म्हणाले की, लोकशाहीत मतदानाचा अधिकार हा सर्वात मोठा अधिकार आहे. योग्य लोकप्रतिनिधी निवडून देत आपण आपले भवितव्य घडवत असतो. नगर शहरात तसेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जैन समाज मोठ्या प्रमाणावर आहे. नरेंद्र मोदी यांच्या अनेक धाडसी निर्णयांमुळे देशाची मान जगभरात उंचावली आहे. जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याने आपल्या समाजासाठी अनेक सवलती मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने दिल्या. त्यामुळे जैन समाजातील युवा वर्गाला लाभ होत आहे. देशातील काही पवित्र जैन तीर्थस्थळे गिळंकृत करण्याचा प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्तींनी चालवला आहे. त्याला पायबंद घालण्याची ताकद नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. ते निश्चितच आपल्या पवित्र जैन तीर्थस्थळांचा वारसा जतन करतील. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी आपली ताकद उभी करणे आपले कर्तव्यच आहे. पद्मभूषण जैनाचार्य परमपूज्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराजा साहेब हे कोविडच्या सुरुवातीला मुंबईत होते. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधून गोचरी पाण्याची (अन्नपाण्याची) व्यवस्था नीट आहे का? वैद्यकीय सुविधांची काही कमतरता नाही ना ? याची आवर्जून आपुलकीने विचारपूस केली होती. अयोध्या येथे जैन तीर्थक्षेत्र (मंदिर) साठी मोयाच्या ठिकाणी ५ एकर जागा व तीर्थक्षेत्र, मंदिर उभारणीसाठी निधीही नरेंद्र मोदींनी दिला आहे. मुंबईतील किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनला जैन तीर्थंकर पार्श्वनाथ भगवान यांचे नाव देण्याचा निर्णयही पंतप्रधान मोदींनी घेतला. साधूसाध्वीजी जेव्हा पायी अनवाणी विहार करतात तेव्हा त्यांना अनेकदा त्रास होतो, अपघात होतात. ही बाब लक्षात घेऊन भाजप सरकारने संपूर्ण देशभरात विहार करणार्‍या साधूसाध्वीजींना पोलिस संरक्षण देण्याचे आदेश जारी केले. असे जैन समाजासाठी, जैन धर्मासाठी अनेक चांगले निर्णय मोदी सरकारच्या काळात झाले आहेत. अशी कामे यापूर्वी ६० वर्षाच्या काळात कोणत्याही इतर पक्षाच्या सरकारने केली नव्हती. त्यामुळे सध्या नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला अन्य पर्याय नाही. भाजप सरकारनेच केंद्रात जैन समाजाच्या खासदाराला मंत्रीपद देवून समाजाला न्याय दिला होता. सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळीच सगळ्यांनीच आपल्या कुटुंबियांसह लवकर मतदानाचा हक्क बजावावा. नंतरच दुकाने उघडण्यासाठी जावे. दुपारनंतर उन्ह जास्त असल्याने मतदान केंद्रावर रांगेत उभे राहण्याचा त्रास टळू शकतो. सकाळीच आपले कर्तव्य बजावून नंतर उद्योग, व्यवसायाकडे वळावे असे आवाहन सुभाष मुथा यांनी केले आहे.