कार्बन मोनॉसाईडचे काय दुष्परिणाम होतात?
कार्बन मोनॉसाईड हा रंगहीन, गंधहीन वायू आहे. या वायूचे अस्तित्व आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने आपल्याला जाणवू शकत नाही. कार्बन आणि सेंद्रिय पदार्थाच्या अर्धवट ज्वलनानंतर हा वायू तयार होतो. जुनाट, वापरात नसलेल्या विहीरी, घर जळताना, डायनॅमाईटचा स्फोट झाल्यानंतर अशा विविध ठिकाणी हा वायू तयार होतो. पाश्चिमात्य देशांत घरोघरी वापरल्या जाणार्या ‘कोलगॅस’ मध्ये कार्बन मोनॉसाइडचे प्रमाण ७ ते १५ टक्के इतके असते. अशा वायुमुळे २ ते ५ मिनिटांत मृत्यू ओढवू शकतो. कार्बन मोनॉसाइड रक्तातील हिमोग्लोबीनशी संयोग पावतो व कार्बोसीहिमोग्लोबीन तयार होते. सहिजिकच त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नाही. प्राणवायूच्या अभावामुळे रक्तवाहिन्यांची आवरणे दुबळी होतात, हृदयाला प्राणवायू न मिळाल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेतही घट होते. हिमोग्लोबीनला या वायूचे खूप आकर्षण असते. किती हिमोग्लोबीन प्राणवायू वाहण्यासाठी निकामी झाले आहे, यावर कोणती लक्षणे दिसून येतील हे अवलंबून असते. या लक्षणांमध्ये दम लागणे, डोकेदुखी, थकवा, घाम येणे, कानात आवाज येणे, चक्कर, मळमळ, उलटी, भ्रम, दृष्टी क्षीण होणे, छातीत धडधड होणे, झटके येणे, कोमा इत्यादींचा समावेश होते. श्वसन बंद पडल्याने मृत्यु ओढवतो. आपल्याकडे या वायूची विषबाधा अपघातानेच पाहायला मिळते. परंतु पाश्चिचमात्य देशात मात्र या वायूमुळे खूप आत्महत्या होतात. उपचारात प्रथमतः रुग्णाला वायूचा प्रादूर्भाव असलेल्या ठिकाणापासून दूर न्यावे. या वायूचे प्रमाण कमी झाल्यावर रुग्ण परत पूर्वपदावर येतो. ५ ते ६ तासात रक्तातील सर्व कार्बन मोनॉसाइड बाहेर पडतो. गंभीर रुग्णांमध्ये रक्त द्यावे लागते. मेंदूवर वायूचा झालेला परिणाम जर कायमस्वरूपी नसेल, तर रुग्ण पुनः पूर्ववत होऊ शकतो