धनशक्ती विरोधात लढा देण्याचे निलेश लंकेंचे धाडस वाखाणण्याजोगे : कृषीभुषण प्रभावती घोगरे

0
20

भिस्तबाग येथील सभेत विखे कुटुंबावर घणाघाती टीका

नगर -विखे घराण्याने सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी सत्तेचे केंद्रीकरण केले आहे. त्यांना हे पटते का ? एकाच घरात आमदार, खासदार, जिल्हा परीषद सदस्य अशी सर्व पदे एकाच कुटूंबाकडे असल्याचे सांगत या धनदांडग्यांच्या विरोधात लढण्याचे एका सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंके यांचे धाडस वाखाणण्याजोगे असल्याचे प्रतिपादन कृषीभुषण प्रभावती घोगरे यांनी केले. लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील भिस्तबाग परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत घोगरे यांचे घणाघाती भाषण झाले. त्यांच्या भाषणास उपस्थितांनी प्रतिसाद दिला. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आ. दादाभाऊ कळमकर, घनश्याम शेलार, जयंत वाघ, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, किरण काळे, बाळासाहेब हराळ यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. घोगरे पुढे म्हणाल्या,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अशी लोकशाही अभिप्रेत नाही. लोकशाहीचा घात करून घरणेशाहीसाठी संविधानाची निर्मीती करण्यात आलेली नाही.

१९ लाख मतदार असलेल्या दक्षिण नगर मतदारसंघात भाजपाला स्थानिक नेता दिसला नाही का ? ज्याच्यावर भरवसा ठेवता येईल, जो शेतकर्‍यांचे प्रश्नह संसदेत मांडेल. जो महिलांसाठी गृहउद्योग, बेरोजगारांसाठी एमआयडीसी आणेल. तुम्ही राहता परिसरातून आले आणि तिथला नेता तुम्हाला आयात करावा लागला. हे दुर्देव आहे. ही हुकूमशाही, हिटलरशाही संपवायची असेल तर तुम्ही वज्रमुठ करा. शेवटपर्यंत निलेश लंके यांच्या पाठीशी उभे रहा. सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील, कोणतीही राजकीय पार्श्वतभुमी नसणारे वर्षानुवर्षे सत्ता उपभोगून मोठे घबाड गोळा न करणारा, धनशक्ती नसणारा तरूण मोठी हिंमत करून शरद पवार यांच्या आशिर्वादाने धनशक्तीविरोधात उभा ठाकला आहे. त्यांची धनशक्ती ही मायबाप जनता असून त्यांना मोठया मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन घोगरे यांनी केले.

५० खोके एकदम ओके : बाळासाहेब थोरात

भाजपा सरकारकडून ईडीचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना तुरंगात डांबण्यात आले. कोणताही आरोप सिध्द झालेला नसताना केवळ धमकाऊन अशा लोकांना पक्षात घेतले गेले. त्यानंतर ते वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यासारखे पवित्र झाले. राज्यातील सरकार पाडण्यासाठी पन्नास पन्नास खोयांचा वापर करण्यात आला. भ्रष्टाचारी एकत्र करून राज्य व केंद्र सरकारचा कारभार सुरू आहे. त्याचे उत्तर मतदानातून देण्याचे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

नगरला चांगल्या शहराचा दर्जा देऊ : निलेश लंके

नगर शहराला चांगल्या शहराचा दर्जा देण्याचा मी शब्द देतो. शहरातील एमआयडीसीची दुरावस्था का झाली ? आमच्या भागात एमआयडीसीची उभारणी झाल्यानंतर मी काळाची पाऊले ओळखून उद्योजकांना संरक्षण दिले. स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यामुळेच नगर पुण्यापेक्षा सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून सुपा एमआयडीसीकडे पाहिले जाते. कुंपणाने शेत खाल्ले अशी परिस्थिती होऊ दिली नाही. नगरमध्ये राजकीय माणसांनी विळखा घातल्याने आज ही अवस्था झाली. सुपा एमआयडीसीच्या बरोबरीने नगरची एमआयडीसी उभी करण्यासाठी पुढाकार घेऊ. असे उमेदवार निलेश लंके यांनी सांगितले.