बाजारपेठेतील रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा महानगरपालिकेसमोर ‘उपोषण’ करणार

0
26

 

नगर – शहरातील खराब रस्त्याचे काम तातडीने सुरू करून सदर प्रश्न निकाली काढावा अन्यथा महापालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मानव भारत अधिकार स्वरंक्षण समितीचे अध्यक्ष इम्रान बागवान यांनी दिला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून त्यात बागवान यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र.११ मधील भंडारी बुक स्टॉल, नालबंद खुंट ते गंजबाजार हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून नागरिकांसह शाळकरी मुले या रस्त्यावरून प्रवास करत असतात. सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. १५ ते २५ दिवसात प्रश्न निकाली न काढल्यास महापालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा बागवान यांनी दिला आहे. यावेळी सोहेल बागवान, सागर होनराव, शेख जावेद, रियाज तांबोळी आदी उपस्थित होते.