चार दिवसांत पाणी पुरवठा सुरु न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार

0
22

 

सध्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असून, त्यामुळे शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेषत: प्रभाग क्र.११ व प्रभाग क्र.१४ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुर्‍या प्रमाणात होत आहे. तरी मनपाने चार दिवसात या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा प्रभागातील नागरिकांसह आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा आदि उपस्थित होते. यावेळी आयुक्तांशी झालेल्या चर्चेत अविनाश घुले यांनी प्रभाग ११ व १४ मधील पाण्याची वस्तूस्थिती मांडतांना सांगितले, गेल्या काही दिवसापासून प्रभाग ११ मधील झेंडीगेट, हातमपुरा, धरती चौक, सथ्था कॉलनी, नवजीवन कॉलनी, मार्केट यार्ड तसेच प्रभाग १४ मधील बुरुडगांव रोड, विनायकनगर, माणिकनगर, सारसनगर आदिं भागात पाणी पुरवठ्याबाबत विस्कळीतपणा आलेला आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. मुळा डॅम येथे उन्हाळ्यातील पाण्याची स्थिती पाहता पाणी उपशासाठी एट्रा पंपाची व्यवस्था केलेली आहे. परंतु ऐन उन्हाळ्यात तो पंपही नादुरुस्त झाला आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पाणी पुरवठा नियोजनाच्या आभावामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तरी तातडीने यात सुधारणा व्हावी, अन्यथा नागरिकांसह आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. याप्रसंगी गणेश भोसले म्हणाले, उन्हाळ्याची तीव्रता आणि पाण्याची टंचाई यांचे नियोजन प्रशासनाने करणे आवश्यक होते. परंतु प्रशासन पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतांना दिसून येतं आहे. गेल्या महिन्याभरापासून प्रशासनास याबाबत कळविण्यात आले. परंतु यात सुधारणा होतांना दिसत नाही. संबंधित अधिकारी व कर्मचारी उडवा-उडवीची उत्तर देत असून, पाणी प्रश्नांचे त्यांना गांभिर्य नाही. त्यामुळे सुधारणा न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नसेल.