आताच्या काळात भगवान महावीर यांच्या विचारांची समाजाला गरज : संपतलाल गुगळे

0
7

चितळे रोडवरील गुगळे परिवाराला चौक सजावट व रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक

नगर – भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये सकल जैन समाजाच्यावतीने रविवारी शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महावीर यांचा अहिंसा, शांतीचा संदेश यानिमित्त देण्यात आला. यावेळी आयोजित चौक सजावट व रांगोळी स्पर्धेत चितळे रोड येथील गुगळे परिवाराने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. गुगळे परिवाराने भगवान महावीर यांचे सुंदर चित्र असलेली रांगोळी रेखाटून अहिंसा परमो धर्म: आणि मातृपितृ देवो भव असा संदेश दिला. आई वडील हे प्रत्येकासाठी देवासमान असतात. त्यांना वृध्दाश्रमात न पाठवता श्रावणबाळाप्रमाणे त्यांची सेवा करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे हे सचित्र दर्शविण्यात आले. चौक सजावट करताना गुगळे परिवाराने आकर्षक व्यासपीठ उभारून जैन ध्वज, झाडांची मनमोहक सजावट केली. विहान रुपेश पटवा याने भगवान महावीर तर अर्हम धिरज भळगट याने आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांची भूमिका साकारून जिवंत देखावा सादर केला.

रांगोळी काढण्यासाठी स्नेहल गुगळे, काजल गुगळे, प्रतिक्षा गुगळे, सिया गुगळे, निखिल गुगळे, कोमल गांधी, शामली रातडीया तसेच चौक सजावटीसाठी नितीश, रोहित, संपतलाल गुगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. चितळे रोडवरील मिरावली बाबा दर्गाह येथील ट्रस्टींनीही या सजावटीसाठी सहकार्य करून एकतेचे दर्शन घडविले. संपतलाल गुगळे यांनी सांगितले की, मागील ३५ वर्षांपासून गुगळे परिवार महावीर जयंतीनिमित्त रांगोळी व चौक सजावट करीत आहे. यात परिवारातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे उत्साहात सहभागी होतात. दरवर्षी महावीर जयंती आधी पंधरा दिवसांपासून परिवारात तयारीला सुरुवात होते. यंदा चौक सजावट व रांगोळी अशा दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने आमचा आनंद व्दिगुणित झाला आहे.