व्यापारी, उद्योजकांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून अडाणी व्यक्तीची बळकावली जमीन

0
56

दुय्यम निबंधक, तलाठी, मंडलाधिकाऱ्यांसह १३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

नगर – निंबळक (ता. नगर) येथील आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबाच्या मालकीची जमीन परस्पर खरेदी करून लाटल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नगरमधील व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, तलाठी, दुय्यम निबंधक अशा १३ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक संपत मोसले यांनी दिली. यासंदर्भात सिंधुबाई मुरलीधर निकम ( वय ७०, रा. निंबळक, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सिंधुबाई निकम यांनी प्रथम न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने फौजदारी दंड संहिता कलम १५६ (३) अन्वये पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दिनेश भगवानदास छाब्रिया (रा. सावेडी, नगर), सरला भगवानदास छाब्रिया (सावेडी, नगर), शिवाजीराव आनंदराव फाळके ( कारेगाव, कर्जत), आशिष रमेश पोखरणा (सर्जेपुरा, नगर), जयवंत शिवाजीराव फाळके (कर्जत), आकाश राजकुमार गुरुनानी (हरदेव नगर, संत निरंकारी भवनमाने, सावेडी), माणिक आनंदराव पलांडे (पिंपळे रोड, मुखाई, पुणे), अजय रमेश पोखरणा (सर्जेपुरा, नगर), गौतम विजय बोरा (कापड बाजार, नगर), नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया (शोभासदन, डीएसपी चौक, नगर), कामगार तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे (निंबळक, ता. नगर) मंडलाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय (नागापूर, नगर), सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन (नगर) या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निंबळक येथील गट क्रमांक ४०/२/३ मधील ५ हेटर ९८ आर व गट क्रमांक ४९१/१/२ मधील २ हेटर ८५ आर मिळकत शिवाजी फाळके, दिनेश छाबरिया तसेच माणिक पलांडे, जयवंत फाळके यांनी आपण व आपल्या कुटुबियांच्या अशिक्षित, अडाणीपणाचा, वयोवृद्धपणाचा गैरफायदा घेऊन कोर्‍या कागदावर व स्टॅम्पवर इतर दस्तांवर सह्या, अंगठा घेऊन तत्कालीन सरकारी अधिकार्‍यांशी हातमिळवणी करत इतर हक्कात असलेल्या आदिवासी मिळकत हस्तांतरणास बंदी असा शेरा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बेकायदा हटवून मिळकत कगदोपत्री बेकायदा खरेदी करून घेतली, तसेच ही मिळकत पुन्हा नव्याने अजय पोखरणा, गौतम बोरा, नरेंद्र फिरोदिया व इतर आरोपींना २१ जून २०२३ रोजी दस्त क्रमांक ४०४७, ४०४८ व ४०४९ अन्वये कटकारस्थान करून बेकायदा नोंदवून मला व कुटुंबाला भूमिहीन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून वरील आरोपींच्याविरुद्ध भा. दं.वि. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ३४, व १२० (ब) सह अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३ (१), (जी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.