आजच्या संगणकयुगातील दैनंदिन जीवनात नवनाथांचा आधार अनुभवा : मिलिंद चवंडके

0
19

भिंगार – आजच्या संगणकयुगातील दैनंदिन जीवनात नवनाथांचा आधार अनुभवा. कलीयुगातील मानवाच्या कल्याणाकरिता नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतले. तप सामर्थ्यांचे अलौकिक दर्शन घडवत आपल्यास जीवनोपयोगी संदेश दिले आहेत. या संदेशरूपाने नवनाथांचा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या, असे आवाहन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांनी केले. येथील नेहरू चौकामधील श्रीचैतन्य कानिफनाथ देवस्थान (आस्थाना) ने आयोजित केलेल्या गुढीपाडवा महोत्सवात दैनंदिन जीवनात नाथांचा आधार या विषयावर ते बोलत होते. सागर फुलारी यांनी स्वागत केले. रामभाऊ पांढरे यांनी मिलिंद चवंडके यांच्या अध्यात्मिक कार्याचा परिचय करून दिला. विजय केदारी महाराजांनी श्री.चवंडके यांना शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सन्मानित केले. श्री.चवंडके पुढे म्हणाले, भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतल्याचा उल्लेख नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात आहे तसा श्रीमद् भागवत ग्रंथातीव पाचव्या स्कंधामध्येही आहे

हिंदू धर्म शुध्दी हेच नवनाथांच्या अवताराचे प्रयोजन होते. गुरूभक्ती, योगसाधना आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम असलेला नाथसंप्रदाय शुध्द आचरणाची शिकवण देणारा आहे. भारताच्या मध्ययुगीन कालखंडात अध्यात्मिक साधनेचे सुवर्णयुग निर्माण करण्याचे मोलाचे योगदान नाथसंप्रदायाने दिले. प्राणी हत्या करत मांसाहार करण्यापेक्षा शुध्द शाकाहारी भिक्षा श्रेष्ठ हे सांगितले. त्यामुळेच अन्नदानास नाथसंप्रदायात खुप महत्व प्राप्त झाले. नवनाथ दुःखितांची दुःखे दूर सारण्याकरिता आपल्या प्रभावी मंत्रशक्तीचा-तप सामर्थ्याचा वापर करत असत. मंत्र, तंत्र, यंत्र सिध्द करून दुःखितांच्या दुःखावर हळूवार फुंकर घालत निरपेक्षपणे दुःख मुक्त करावे, याचा कृतीशील आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला. प्रापंचिकांच्या समस्या सोडवताना प्रपंचात गुंतून न पडता आत्मोध्दार करून घ्या, असा सल्लाही दिला. परमात्मा सृष्टीरूपाने नटला आहे याकडे लक्ष वेधत पर्यावरण संरक्षणाचे संदेश दिले. गोरक्षनाथांनी गोवरगिरीत जन्म घेऊन गोमातांचे शेण पवित्र अत्यंत पवित्र असल्याचे दाखवून दिले.

मंत्रयोग, लययोग, हठयोग व राजयोग यांच्या सहाय्याने शिवरूप होण्याचे गूढ विषद करत जीवनमुक्तीचे रहस्य निवेदन केले. कडक ब्रम्हचर्य, योगसाधना आणि शिवउपासना यामधून हिंदू धर्माला शुध्दतेच्या उच्च पातळीवर नेले. तिबेटी परंपरेतही स्थान मिळवलेल्या नाथ संप्रदायाने महाराष्ट्रामधील विविध साधना प्रणालींशी समन्वय साधला. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत बहरलेल्या तंत्रसाधनेवर नाथ संप्रदायाने वेगळेपणाचा ठसा उमटवला. योगप्रधान शिवयुक्त अनुभूतींनाच प्रमाण मानले. वामाचारी विकृत साधनांच्या निर्मूलनासाठी आणि भारतीय धार्मिक जीवनाच्या शुध्दीकरणासाठीच नवनाथ अवतरले, असे श्री.चवंडके यांनी विविध आख्यायिका आणि प्रसंगामधील गूढ उकल करून देत सांगितले. प्रवचन सोहळ्यास भाजपचे शहर जिल्हा सरचिटणिस महेश नामदे, शिवसेनेचे शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, छावणी परिषदेचे नगरसेवक रविंद्र लालबोंद्रे, अरूण फुलारी, बाबू नायकू, किशोर फुलारी, भीमराव लालबोंद्रे, रणजित रासकर, राजेंद्र परदेशी, योगेश नायकू, लक्ष्मण नामदे (चिंचवड, पुणे) अक्षय नायकू, दिपक नायकू, तेजस लालबोंद्रे, संदिप मालवंडे, आनंद नायकू, सचिन बिडकर यांच्यासह स्त्री-पुरूष भाविक उपस्थित होते. चैतन्य कानिफनाथ आस्थाना भक्त मंडळ, नवरंग ग्रुप, नेहरु चौक तरुण मंडळ आणि बालगोपाल या सर्वांनी गुढीपाडवा महोत्सवासाठी अथक परिश्रम घेतले. गुढीपाडवा महोत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली.