जागा बळकाविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर देहत्याग करणार

0
48

विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार 

नगर – जागा बळकाविण्याच्या उद्देशाने ४ एप्रिल रोजी पहाटे घरावर पेट्रोल ओतून पेटविल्याप्रकरणी व ७-१२ उतार्‍यावर बेकायदेशीर खाडाखोड करून स्वतःचे नाव लावून ताबा मारणारा तो स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता, काही गावगुंड व तत्कालीन तलाठी, सर्कल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची म ागणी तक्रारदार राजू कोळी, रेश्मा कोळी, कौसाबाई सरोदे व अन्याय निवारण सेवा समितीचे अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात थेट आयजी बी.जी. शेखर पाटील यांच्याकडे केली आहे. गुरुवारी पहाटे चिचोंडी पाटील येथील नगर-जामखेड रस्त्यालगतच्या घराला पाठीमागच्या बाजूने पेट्रोल ओतून आग लावून देण्यात आली. मी व पत्नी रस्त्यालगतच्या स्वतःच्या मालकीच्या हॉटेलच्या खोलीत झोपले असताना जीव वाचला. सदर राहत असलेल्या जागेचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. राहत असलेले घर व हॉटेल ही जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी घर जाळून टाकण्याची व घर खाली करण्याची धमकी देण्यात आलेली होती. याबाबत तक्रार देखील केलेली आहे. घराला पेटवून देण्याची घटना घडलेली असताना नगर तालुका पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवून घेतली गेली नसल्याचे निवेदनात कोळी दाम्पत्याने म्हंटले आहे.

गट नंबर मधील आठ गुंठे जमीन विकण्यात आली. त्याने तलाठी, सर्कल यांना हाताशी धरुन सातबारा उतार्‍यावर बेकायदेशीर खाडाखोड करून १५.१० गुंठे जमीन स्वतःच्या नावावर लावून घेतली. कोरोना काळात टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन राहते घर पाडून त्याला दगडी कंपाउंड केले. या जागेची शासकीय भूमी अभिलेख यांच्याकडून मोजणी झालेल्या जमिनीच्या खुना असलेल्या क्षेत्रातही बेकायदेशीर ताबा घेतलेला आहे. याची विचारणा केली असता, तो कार्यकर्ता व गावगुंड शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. जागा बळकाविण्याचा प्रयत्न करणार्‍या त्या कार्यकर्ता गावगुंडांवर गुन्हा दाखल करुन न्याय मिळण्याची मागणी आयजी बी.जी. शेखर पाटील यांच्याकडे करण्यात आली. अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर देहत्याग करण्याचा इशारा देण्यात आला आहे.