रस्त्याचे काम सुरू असताना बॅरिकेटिंगसाठी प्रभू श्रीरामांची प्रतिमा असणारा ‘फ्लेक्स लावला उलटा’

0
96

नगर-बाजारपेठेतील रस्त्याचे काम सुरू असताना बॅरीकेटिंगसाठी प्रभू श्रीरामांची प्रतिमा असणारा फ्लेस उलटा लावण्यात आला होता. त्यावरून बुधवारी रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटना समोर येताच तात्काळ तो फ्लेस हटविण्यात आला. मात्र यावरून काँग्रेसने फ्लेस लावणार्‍या भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. प्रभू श्रीरामांचा अवमान काँग्रेस कदापि खपवून घेणार नसल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे. काळे म्हणाले की, त्या फ्लेसवर देशाचे पंतप्रधान, भाजपचे खासदारकीचे उमेदवार यांच्यासह भाजप नेत्यांचे देखील फोटो आहेत. तो फलक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने लावला होता. मुळात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असताना आधीच तो फ्लेस भाजपने काढून घेणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. त्यातच त्या ठिकाणी काम करणार्‍या रस्त्याच्या ठेकेदाराने देखील चुकीचे कृत्य केले आहे. प्रभू श्रीराम हे तमाम हिंदूंसाठी आस्थेचा विषय आहेत. अशा पद्धतीने जर त्यांच्या प्रतिमेची विटंबना होणार असेल तर काँग्रेस ती कदापी खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि आचारसंहिता कक्षाने यावरती संबंधित दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे काळे म्हणाले.

भारतीय जनता पार्टीकडून श्रीरामांचा अवमान, जाहिरातबाजीसाठी सर्वसामान्य नगरकरांवर कारवाई करू नये

केवळ निवडणुका आल्या की प्रभू श्रीरामांचे नाव घ्यायचे. त्यांच्या नावाने साखर वाटायची. दिवाळी साजरी करतो म्हणायचे. निवडणुकांपुरते प्रभू श्रीरामांचे नाव घ्यायचे आणि दुसर्‍या बाजूला अशा पद्धतीने त्यांचा अवमान होईल, असे कृत्य करायचे. भाजपला प्रभू श्रीराम हे केवळ राजकारणा पुरते हवे आहेत. त्यांना त्यांच्याबद्दल मनापासून आस्था नाही. हे अनेक वेळा उघड झाले आहे. यापूर्वी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नगर शहरामध्ये आले असता जय श्रीरामची घोषणाबाजी सुरू असताना त्यांनी ती थांबवून नरेंद्र मोदींचा जयजयकार करण्याचा प्रताप केला होता. त्याही वेळेला काँग्रेसने त्याचा निषेध केला होता. भाजप पदाधिकार्‍यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये भाजपच्या उमेदवारांनी माझ्याकडून पाच वर्षात काही चुकले असेल तर माफी मागतो असे म्हणत माफीनामा सादर केला होता. ज्यांना माफीवीर व्हायचं आहे त्यांनी जरूर व्हावे. प्रभू श्रीरामांचा अवमान भारतीय जनता पार्टी कडून शहरामध्ये झाला आहे. त्याबद्दल सुद्धा भाजपचे उमेदवार तमाम हिंदू धर्मियांची माफी मागणार काय ? असा संतप्त सवाल करत भाजपने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांनी केले आहे.