पाईपलाईन तुटल्याने रामवाडीत पाणीबाणी, महिलांनी घेतली महापालिका उपायुक्तांची भेट

0
55

पाईपलाईन दुरुस्त करावी

नगर – शहरातील रामवाडी भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तुटल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक महिलांनी मनपा उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांची भेट घेवून सदर पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करुन देण्याची मागणी करण्यात आली. विकास उडाणशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पाण्याचा प्रश्न मांडण्यात आला. यावेळी कल्पना मंडलिक, रवीना उल्हारे, दिपाली उल्हारे, नीता उडाणशिवे, सोनाली अडागळे, दुल्हनबाई गायकवाड, शिलाबाई वैरागर, मीना गायकवाड, मंदा वाघमारे, कमल उल्हारे, अलका काळोखे, अनुसया सोनवणे, मनीषा घोरपडे आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या. १६ मार्च रोजी कराचीवालानगर मध्ये रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. सदर रस्त्याच्या कडेला पितळे वस्तीगृह ते कराचीवालानगर ते रामवाडी अशी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पूर्वीपासून आहे.

या कामामध्ये रामवाडी भागात पाणीपुरवठा करणारी पिण्याचे पाईपलाईन तुटली. यामुळे रामवाडी भागात पिण्याचे पाणी येण्यास बंद झाले आहे. तर तुटलेल्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. काही महिन्यांपासून महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये आचारसंहिता सुरू झाली आहे. इतया तातडीने कामासाठी रस्ता खोदून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुटल्याने येथील नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाविषयी गैरसमज निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. याप्रकरणी तातडीने पिण्याची पाण्याची पाईपलाईन तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी रामवाडी येथील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.