शेतकऱ्यांना आता कांद्याचे वजन मोबाईलवर दिसणार : शिवाजीराव कर्डिले

0
72

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व नेप्ती उप बाजार समिती आवारातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

नगर – नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या १५ वर्षांमध्ये शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांना बरोबर घेऊन विकासाची कामे सुरू आहेत. माजी सभापती भानुदास कोतकर यांनी नेप्ती उपबाजार समितीची स्थापना करून कांदा मार्केट उभे केले. आज राज्यात नावलौकिक झाला आहे. या ठिकाणी शेतकरी वर्ग विश्वासाने मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी घेऊन येत असतात. आता ही जागा सुद्धा कमी पडत असून लवकरच शेजारील सात एकरामध्ये दुसरे कांदा मार्केट उभे राहणार आहे. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व नेप्ती उपबाजार समिती आवारामधील रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून शासनाच्या माध्यमातून सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नगर जिल्ह्यातील कांदा जलद गतीने बाहेर पाठवण्यासाठी रेल्वे धक्का सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नगर जामखेड काँक्रिटीकरण रस्त्यासाठी ६५७ कोटी रुपये मंजूर झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील मंत्रिमंडळात खा.डॉ. सुजय विखे पाटील मंत्री होणार आहे. नेप्ती उप बाजार समिती उभारण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज नील झाले. नेप्ती उपबाजार समितीमध्ये सॉफ्टवेअर बसवले असून, शेतकर्‍यांना आता थेट मोबाईलवर कांद्याचे वजन दिसणार आहे.

त्यामुळे लवकरच ऑनलाईन मार्केट सुरू होणार आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या मालाच्या सुरक्षेतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. बाजार समितीमध्ये विजेची बचत व्हावी यासाठी सोलरचा प्रोजेट उभारण्यात आला आहे. त्यामुळे मार्केट यार्ड येथील विजेचा खर्च वाचला असून, नेप्ती उप बाजार समितीमध्ये देखील लवकरच सोलर प्रोजेट उभारला जाणार असून, वर्षभरातील विजेचे सुमारे २० लाख रुपयांचे बिल वाचणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व नेप्ती उप बाजार समिती आवारातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ झाला. यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप, अक्षय कर्डिले, विनायक देशमुख, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, हमालपंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास शिंदे, हरिभाऊ कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुका अध्यक्ष दीपक कार्ले, संचलक संतोष म्हस्के, अभिलाष घिगे, रेवण चोभे, सुभास निमसे, सुधीर भापकर, सचिव अभय भिसे, सचिन सातपुते, विशाल पवार, दत्ता तापकिरे, भाऊसाहेब ठोंबे, संजय गिरवले, भाऊ भोर गुरुजी, धर्मनाथ आव्हाड, मधुकर मगर, राजू आंबेकर, मंजाबापू घोरपडे, रामदास सोनावणे, राजेंद्र बोथरा, निलेश सातपुते आदींसह संचालक मंडळ, व्यापारी, शेतकरी वर्ग उपस्थित होते. सभापती भाऊसाहेब बोठे म्हणाले की, मार्केट यार्ड मधील रस्ते माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या काळामध्ये झाले होते.

आता रस्ते खराब झाले असून, माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या पणन विभागाकडून सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी उपसभापती रभाजी सूळ यांनी स्वागत करून आभार मानले. आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर होत असून, विकसित शहर निर्माण होत आहे. मी २५ वर्ष आमदार होतो एकदा मंत्री होतो, मात्र मला कधीही एवढा निधी मिळाला नाही मी जर यावेळेस आमदार असतो तर नक्कीच १ हजार कोटी रुपये मंजूर करून आणले असते. लोकसभेची निवडणूक लढवणे ही सोपी गोष्ट नाही. मीसुद्धा निवडणूक लढवली होती, त्यामध्ये माझा पराभव झाला होता. लोकसभा निवडणूक फक्त विखे कुटुंबियांनीच लढावी. सुजय विखे पाटील मंत्री झाल्यानंतर आम्हाला विसरून जाऊ नका म्हणजे झाले, असे परखड मत शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.