‘जीवघेण्या खड्डेमय रस्त्या’ची दुरुस्ती होत नसल्याच्या निषेधार्थ घालणार जागरण गोंधळ

0
55

भाळवणी ते पारनेरच्या रस्त्याची दयनीय अवस्था छायाचित्रात दिसत आहे.

नगर – जीवघेणा बनलेल्या खड्डेमय रस्त्याची वारंवार तक्रार करुन देखील रस्ता होत नसल्याने भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोर जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. भाळवणी ते पारनेरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात काटेरी जंगल वाढले आहेत. कोट्यावधी रुपयांचा निधी येऊन देखील रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. निधीमध्ये अपहार होत असल्यामुळे रस्त्याचे काम रखडले असल्याचा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे. भाळवणी ते पारनेर हा रस्ता पारनेर तालुयातील बाजारपेठ व महत्त्वाच्या कार्यालयांना जोडणारा आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरु न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर २० फेब्रुवारी रोजी जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

पारनेर मधील २०२२-२३ आर्थिक वर्षात झालेल्या दुरुस्ती कामाची सखोल चौकशी करुन लेखी खुलासा मिळण्याचीही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले आहे. रस्त्याच्या प्रश्नावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या आंदोलनासाठी अ‍ॅड. अरविंद अंबेटकर, अंबादास शिंदे, जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे, महिला जिल्हाध्यक्षा अलकाताई झरेकर, उमेश गायकवाड, प्रेरणाताई धेंडे, अमोल बोरगे, अनिल पठारे, दीपक साळवे, बाबासाहेब डोळस, सनी कांबळे, बाबासाहेब महापुरे, प्रिया जगताप, काशिनाथ पाचंगे आदी प्रयत्नशील आहेत.