नगर – राष्ट्रसंत आचार्य भगवंत गुरुदेव श्री आनंदऋषीजी म. सा. १२५ वी जन्मजयंती निमित्त ३० साधु-साध्वीजी आणि ७५०० हून अधिक भाविक आणि भक्तांच्या उपस्थितीत ४१५ वर्षितप तपस्वींचा वर्षितप पारणा महोत्सव उत्साहात
झाला. आचार्य भगवंत आनंदऋषीजी महाराजांच्या पवित्र जन्मस्थान असलेल्या चिचोंडी येथे आनंदतीर्थाच्या पवित्र क्षेत्रात शाही पारणा महोत्सव उत्साहात पार पडला. या विशाल आणि भव्य प्रांगणात सर्वत्र अनुमोदनेचे स्वर गुंजित राहिले. अर्हम
विज्जा प्रणेता उपाध्याय भगवंत प्रवीणऋषीजी म.सा.च्या सत्प्रेरणेतून २०१३ पासुन वर्षितप पारणा महोत्सवाची चिचोंडी येथे सुरूवात झाली. यंदाच्या पारणा महोत्सवात उपाध्याय भगवंत प्रवीणऋषीजी म.सा. आदि ठाणे २, तरुण तपस्वी मुकेशमुनीजी म.सा. आदि ठाणे, महासती कांचन कंवरजी म.सा. आदि ठाणे, महासती सुनंदाजी म.सा. आदि ठाणे, महासती आदर्श ज्योतीजी म सा., आदि ठाणे, महासती सुप्रियाजी म.सा.आदि ठाणे महासती ओजसदर्शनजी म सा. आदि ठाणे अशा एकूण २७ गुरु भगवानांची पवित्र उपस्थिती आणि आशीर्वाद सर्व तपस्वी आणि गुरुभक्तांना मिळाला.
सर्व गुरु भगवानांनी तपस्वींच्या मान्यतेने अक्षय्यतृतीयेचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले. त्यांनी सांगितले की, या देशात कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि राष्ट्रीय व्यवस्था प्रथम भगवान ऋषभदेव यांनी स्थापित केली होती. भगवान ऋषभदेव
हे केवळ इतिहासाचे गायक नव्हते तर इतिहासाचे निर्माते देखील होते. जेव्हा समजावून सांगूनही दुर्जनांनी ऐकले नाही, तेव्हा त्यांना शस्त्रांची भाषा शिकवणारे भगवान ऋषभदेव होते. भारताला हे नाव ऋषभदेवांमुळे मिळाले, पण आज आपण त्याचा अभिमान बाळगायला विसरलो आहोत. उपाध्याय भगवंत यांनी भगवान ऋषभदेव यांच्या जीवनाचे अचूक वर्णन केले.
वर्षितप पारणा महोत्सवाच्या लाभार्थी, परम गुरु भक्त श्रीमती ज्योत्स्नाताई रतिलाल मुथा, कु. नीलम राहुलकुमार मुथा आणि मुथा परिवार (निगडी प्राधिकरण) यांनी सर्वांची श्रद्धेने, भक्तीभावाने आणि अंतःकरणाने पारणा सेवा केली. त्यांच्या
चेहर्यावरील आनंद आणि भावनेने संपूर्ण वातावरण भक्तीने भरून गेले. त्यांना गुरु आनंद फाउंडेशनकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आनंद तीर्थाच्या बांधकामात योगदान देणार्या सर्व देणगीदारांचा गुरु आनंद फाउंडेशनने सन्मान केला. गुरु आनंद फाउंडेशन आणि ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष सतीश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील १०० हून अधिक सक्रिय कार्यकर्त्यांचा त्यांच्या परिश्रम, समर्पण आणि आनंदतीर्थावरील श्रद्धेबद्दल अभिनंदन करण्यात आले. या पारणा महोत्सवात, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून तसेच चेन्नई, बंगळुरू, म्हैसूर, जयपूर, जोधपूर, हैदराबाद इत्यादी प्रांतांमधून तपस्वी, गुरुभक्त आणि भक्तांनी कडक उन्हात दीर्घ प्रवास करीत महोत्सवाला हजेरी लावली आणि गुरुदेवांनी त्यांचे अभिनंदन केले.