फायटर जेटमधून पडलेला जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी

0
77

नगर – राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात फायटर जेट विमानामधून पडून जमिनीमध्ये सात फुटांवर
रूतून बसलेला जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी करण्यात आला. यासंदर्भात खा. निलेश लंके यांनी लष्करी अधिकार्‍यांच्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. या सुचनांची दखल घेत लष्कराकडून १ मे रोजी हा बॉम्ब निकामी करण्यात आला.

वरवंडी येथे फायटर जेट विमानातून हा बॉम्ब पडून जमीनीमध्ये रूतल्याने शेतकर्‍यांच्या जल वाहिन्या फुटल्या. त्यामुळे शेतांमधील पीके जळण्याची वेळ आली होती. सात दिवस उलटूनही बॉम्ब हटविण्यासंदर्भात काहीही कार्यवाही झाली
नव्हती. खासदार निलेश लंके यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी स्टेशन कमांडर आणि लष्करी अधिकार्‍यांच्या
समवेत पार पडलेल्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. या बैठकीत नागरीकांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे यावेळी मान्य करण्यात
आले होते. १ मे रोजी लष्करी तज्ञांच्या पथकाने हा जिवंत बॉम्ब सुरक्षितपणे काढून तो आपल्या ताब्यात घेतला. हा बॉम्ब निकामी करण्यात आल्याची माहीती स्टेशन कमांडर यांनी खा. लंके यांना दिली. हा बॉम्ब निकामी करण्यात आल्याने परिसरातील शेतकर्‍यांना तसेच नागरीकांना मोठा दिलासा मिळाला असून एक संभाव्य आपत्ती टळली आहे. या घटनेनंतर लष्करी हददीतील समस्या, शैक्षणिक गरजा आणि मंदीर विकास आदी प्रश्नांवरही लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.