वाढती अतिक्रमण व अवैध धंद्यांमुळे माळीवाडा वेशीचा श्वास गुदमरला

0
115

दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना होतोय त्रास; महापालिका आयुक्तांचे निवेदनाद्वारे नागरिकाने वेधले लक्ष, कारवाईची मागणी

नगर – अहिल्यानगर शहरात मध्यवर्ती असलेल्या माळीवाडा चौक आणि वेशीच्या परिसराला अतिक्रमण
आणि अवैध धंदेवाल्यांनी पूर्णपणे विळखा घातला असून हा परिसर पुर्णपणे काबीज केलेला दिसत आहे. माळीवाडा
वेस येथे महात्मा फुले यांचे स्मारक असून त्या पासून जवळच शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर आहे. या
ठिकाणी दररोज अनेक भाविक दर्शनाला येतात. मात्र त्यांना या अतिक्रमणांमुळे
वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील अतिक्रमण
व अवैध धंदे कधी बंद होणार? माळीवाडा वेस कधी मोकळा श्वास घेणार असा सवाल
या परिसरातील नागरिक विरभाऊ पाचपुते यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना
केला आहे.  याबाबत दिलेल्या निवेदनात पाचपुते यांनी म्हटले आहे की, माळीवाडा वेशीला
तर चारीही बाजूने अतिक्रमणांनी वेढा घातला आहे. तेथे तर लागणार्‍या अनधिकृत हातगाड्या, टपर्‍या यांनी वेशीच्या नावावर
अनधिकृत नळ जोडणी केली व वेशीच्या वरील वीजेच्या लाईनवर केबल टाकून स्वतःच्या अतिक्रमणातील गाड्यांना वीज
जोड घेतले आहेत. महत्वाचे म्हणजे वेशीच्या शेजारी, बाजूस चहा, वडेवाल्यांनी गाळे भाडे
तत्वावर घेऊन त्या पुढे रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेले
गाळे हे त्यांना रोजगारासाठी दिले होते परंतु त्यांनी त्याच्यावर अनाधिकृत बांधकाम
करुन त्या गाळ्यात अवैध व्यवसाय चालू केला. या विरोधात अनेक वेळा
तेथील स्थानिक नागरिकांनी निवेदन दिले परंतू ठोस अशी कार्यवाही करण्यात येत नाही. महापालिकेच्या
अतिक्रमण विभागाचे पथक आले की हे लोक गाड्या काढतात आणि नंतर परत लावतात. त्यामुळे खुप मोठ्या प्रमणात
वाहतूक कोंडी होते. चतुर्थी असल्यास या अतिक्रमणामुळे हा रस्ता बंद ठेवावा लागतो.
त्यामुळे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलिस प्रशासनास आवाहन आहे की, या माळीवाडा चौकाला मोकळा श्वास घेऊ द्या, तेथील अवैध धंदे बंद करा तसेच अवैध नळ जोडणी करणार्‍या, विज चोरी करणार्‍यांविरुध्द गुन्हे नोंदवून ते अतिक्रमण तात्काळ कायमस्वरुपी काढून टाकावे, अशी मागणी पाचपुते यांनी निवेदनात केली आहे.