झेलम एसप्रेस १६ दिवसांसाठी रद्द : प्रवाशांनी व्यक्त केला संताप

0
35

श्रीरामपूर – पुण्याहून जम्मूतावीला जाणारी व जम्मूतावीहून पुण्याला येणारी झेलम एसप्रेस ही गाडी १६ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पत्रकात देण्यात आली आहे. जम्मू येथे रेल्वे यार्डचे मोठे काम सुरू असल्याने सुमारे ३७ दिवसांसाठी वेगवेगळ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पुण्याहून जम्मूतावीला
जाणारी ११०७७ क्रमांकाची गाडी १७ फेब्रुवारी  ते ४ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे तर जम्मूतावीहून पुण्याला येणारी ११०७८ क्रमांकाची गाडी २१ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत बेलापूर म्हणजे श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवर येणार नाही. त्यामुळे सर्व
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रवासी संघटनेने केले आहे. रेल्वेने झेलम रेल्वे १६ दिवस रद्द करण्याचा
निर्णय घेतल्याबद्दल नगर व श्रीरामपूर मधील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या भागातून मोठ्या
संख्येने प्रवासी वैष्णोदेवीसाठी या गाडीने जम्मूतावीला जातात तसेच दिल्ली आणि पंजाबमधील अनेक गावांना जाण्यासाठी ही थेट गाडी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे खात्याने ही गाडी पूर्णपणे रद्द न करता किमान नवी दिल्लीपर्यंत सुरू ठेवायला पाहिजे होती अशी अपेक्षा बंटी गुरुवाडा, सलीमखान पठाण, अशोक उपाध्ये,
राजेंद्र सोनवणे, अयाज तांबोळी यांनी व्यक्त केली. रेल्वेच्या या तुघलकी निर्णयाने प्रवाशांना अनेक गैरसोयीना सामोरे जावे लागणार आहे. सध्या लग्नसराई व परीक्षेचा कालावधी सुरू असल्याने या काळात होणार्‍या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी नाराजी
व्यक्त केली आहे.