१२०० जणांना रोजगार मिळणार, अजूनही कंपन्या संपर्कात – खा.निलेश लंके
नगर – टॉरल इंडिया या आघाडीच्या एकात्मिक ॲल्युमिनियम फाउंड्रीने सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमध्ये ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगामुळे पारनेर तालुक्यातील १ हजार २०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या बरोबरच अजूनही अनेक कंपन्या येणार असल्याची माहिती खा. निलेश लंके यांनी दिली.
टॉरल इंडियाने त्यांच्या प्रगत उत्पादन सुविधेचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सांमजस्य करार केला आहे. पुण्यातील टॉरल इंडियाची सध्याची ३ लाख चौरस फुट सुविधा उत्पादन डिझाईनपासून ते गुणवत्ता चाचणी, रंगकाम, असेंब्ली, आणि वितरणापर्यंत व्यापक ॲल्युमिनियम सॅड-कास्टिंग सोल्यूशन प्रदान करते. उर्जा संरक्षण एरोस्पेस, सागरी, रेल्वे आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रातील वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी विस्तारित सुपा येथील सुविधा चार पट मोठी असेल.
या महत्वपुर्ण गुंतवणूकीसह टॉरेल इंडियाचे उद्दीष्ट नवोपक्रमांना चालना देणे, स्थानिक प्रतिभेला सक्षम करणे आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक महत्वाकांक्षेत योगदान देताना महत्वाच्या उद्योगांमध्ये भारताचे स्वावलंबन वाढविणे आहे.
५०० कोटी रूपयांची गुतवणूक टॉरल इंडियासाठी एक निर्णायक क्षण आहे, कारण आम्ही प्रगत उत्पादनात नवीन उंची गाठत आहोत. सुपा प्लान्टचा विस्तार केवळ क्षमता वाढविण्यासाठी नाही तर तो उद्योगांचे विकेंद्रीकरण टियर २ आणि टियर ३ क्षेत्रांना सक्षम बनविणे आणि १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून योगदान देण्याबद्दल आहे. असे कंपनीचे एमडी व सीईओ भरत गिते यांनी सांगितले.
सुपा एमआयडीसीची बदनामी करणाऱ्यांना चपराक
सुपा एमआयडीसी हे शांततेचे प्रतिक आहे. त्यामुळे अनेक उद्योग येथे येत आहेत. अनेक कंपन्या या औद्योगिक क्षेत्रात येण्यास तयार असून ते उद्योजक, कंपनी व्यवस्थापन आपल्या संपर्कात आहेत. असे सांगत सुपा औद्योगिक क्षेत्राची बदनामी करणे हा काही लोकांचा धंदा आहे. त्यांनी आपल्याकडे काय चालले आहे हे आगोदर पहावे त्यानंतर इतरांवर चिखलफेक करावी. असा टोला खा. निलेश लंके यांनी लगावला आहे.