स्किल इंडियासाठी केंद्राची ८८०० कोटींची तरतूद

0
84

नगर – केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा स्किल इंडिया कार्यक्रमासाठी ८८०० कोटींची तरतूद केली आहे. आता ही योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायकराव देशमुख यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे सदर योजना पुढेही चालू ठेवण्यास आणि त्या योजनेत आवश्यक ती पुनर्रचना करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत १५ ते ५९ या वयोगटातील लाभार्थ्यांना विविध विषयांचे व्यावसायिक प्रशिक्षणदिले जाते. हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत असून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांना प्राधान्याने बँकेकडून कर्जही उपलब्ध करून दिले जाते. तसेच विविध उद्योगातील नोकरीच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत आंतरराष्ट्रीय गतिशीलतेवर भर देण्यात आला असून जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कौशल्यांनी सुसत्र मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. कौशल्य विकास व रोजगार मंत्रालयाने विविध देशांसोबत मोबिलिटी भागीदारी करार आणि सामंजस्य करार केले असून या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांच्या आंतरराष्ट्रीय गतिशीलता संधी वाढविण्यासाठी डोमेन कौशल्ये, संयुक्त प्रमाणपत्रे, भाषा प्राविण्य आणि सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण देण्यात येते. बेरोजगारी निर्मूलनासाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे. सदर योजना ग्रामीण भागातील पात्र युवक, युवतींपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत श्री. देशमुख यांनी व्यक्त केले.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत असतात. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याबाबत आपण ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्याशी बोलणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.