स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून शहरातील काटवन खंडोबा रस्त्याचे काम मार्गी लागणार : आमदार संग्राम जगताप

0
45

नगर – आगरकर मळा या उपनगराला जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे काटवन खंडोबा रस्ता या डीपी रस्त्याचे काम मार्गी लागावे, यासाठी राज्य शासनाकडून सुमारे साडेसात कोटी मंजूर करून घेतले आणि महापालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदार देखील नियुक्त केला आहे मात्र काही स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे एक वर्ष होऊन देखील रस्त्याचे काम सुरू झाले नाही. आज नागरिकांसमवेत पाहणी करत रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे सारखाच रस्ता मोजून काम सुरू करण्यासाठी नागरिकांनी सहमती दिली आहे. काटवन खंडोबा हा रस्ता काँक्रिटीकरण होणार असून, या भागाच्या विकासाला गती प्राप्त होत सुशोभीकरणाचे रूप प्राप्त होईल. स्थानिक नागरिकांच्या जागेला देखील मोठ्या प्रमाणात भाव वाढ होईल. तरी शहर विकासासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे. काटवन खंडोबा रस्त्यावरील खोकर नाला या ओढ्यावरील आरसीसी पुलाचे काम देखील मार्गी लागले आहे.

काटवन खंडोबा रस्त्याच्या कामासाठी स्थानिक नागरिकांसमवेत केली पाहणी

सकाळी आयुर्वेद चौक ते आगरकर मळापर्यंत स्थानिक नागरिकांसमवेत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत मार्ग काढला आहे. लवकरच स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून काटवन खंडोबा रस्त्याचे काम मार्गी लागणार असून त्यासाठी महापालिकेने देखील पाण्याची लाईन स्थलांतरित करून ठेकेदाराला काम सुरू करण्यासाठी मार्किंग करून द्यावे, तसेच एमएसईबीने देखील डीपी, विद्युत खांब तातडीने स्थलांतरित कराव्यात, अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. काटवन खंडोबा रस्त्याच्या कामासाठी आ. संग्राम जगताप यांनी स्थानिक नागरिकांसमवेत पाहणी केली. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, प्रा. माणिकराव विधाते, संभाजी पवार, विजय गव्हाळे, अनुप काळे मयूर बांगरे, राजू जाधव, शाम व्यवहारे, अशोक आगरकर, किसन व्यवहारे, विश्वास डांगे, गजानन ससाणे, शहर अभियंता मनोज पारखे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, नगर रचना विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सुहास मुळे म्हणाले की, कालच्या पावसाने पूर्णपणे बंद झालेला चिखलमय काटवण खंडोबा रस्ता या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करून त्या रस्त्याचे काम मार्गी लावण्याची विनंती केली. काटवण खंडोबा रस्ता हा नगरमधील सगळ्यात महत्त्वाचा रस्ता असून, तो गेल्या ७५ वर्षापासून दुर्लक्षित राहिलेला आहे.

आ. संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत या रस्त्याच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला मात्र विकास आराखड्यातील ६० फूट रुंदीचा तो सगळ्यात मोठा रस्ता आहे आणि तो प्रत्यक्षात दहा फूट देखील अतिक्रमणांमुळे शिल्लक राहिलेला नाही. साडेसात कोटी रुपये मंजूर होऊन ट्रेझरीमध्ये येऊन पडलेले आहेत, त्याला दोन वर्षे पूर्ण झालेले आहेत. सदर रस्त्याचे टेंडर काढून वर्क ऑर्डर काढून देखील एक वर्ष पूर्ण झाले आहे. तो निधी पूर्णपणे काटवन खंडोबा रस्त्याला दिला गेला, परंतु त्याचा विनियोगच न झाल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून पडून राहिलेल्या या निधीचे व्याजच पावणेदोन कोटी रुपये झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या आणि तेथील प्रत्यक्ष अतिक्रमण केलेल्या पुढार्‍याच्या देखील एक दोन मीटर जमिनीच्या विरोधामुळे एवढे मोठे काम अडून पडलेले आहे. आता या रस्त्याचे काम मार्गी लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.