कांद्याच्या आवकमध्ये नगरमध्ये झाली वाढ

0
107

निर्यातबंदी उठल्याने बाजारभावात सुधारणा

नगर – केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्यानंतर बाजारभावात सुधारणा होण्यास सुरुवात झाली असून, कांद्याचे भाव २ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचले आहेत. साधारण २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे कांद्याचे बाजार वधारले आहेत. मागील काही महिन्यांपासून कांद्याच्या निर्यातबंदीबाबत शासन स्तरावर तळ्यात-मळ्यात सुरू होते. निर्यातबंदी असल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत होता. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. सरकारने निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि शेतकर्‍यांकडून केली जात होती. अखेर केंद्र सरकारने निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय जाहीर केला. निर्यातबंदी उठल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली असून, बाजारभावातही काही प्रमाणात सुधारणा होत आहे. नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी (दि. ६) सुमारे दिड लाख कांदा गोण्यांची आवक झाली असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला सर्वाधिक २ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव निघाले आहेत.