निवडणुकीत महायुतीचे काम न करता, तटस्थ राहण्याची भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निर्धार बैठकीत ‘बंडा’चा इशारा

0
40

नगर दक्षिण व शिर्डीत उमेदवारी नाकारून आंबेडकरी चळवळ मोडीत काढण्याचा घाट

नगर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून मागणी केलेल्या शिर्डी व सोलापूरच्या जागेपासून डावलण्यात आल्याने शहरात झालेल्या निर्धार बैठकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटला. महायुतीकडून स्वाभिमानाने सत्तेत वाटा देण्याची हमी मिळत नाही, तो पर्यंत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीत महायुतीचे काम न करता, तटस्थ राहण्याची भूमिका घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तर नगर दक्षिण व शिर्डी लोकसभेची उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची भूमिका पदाधिकार्‍यांनी मांडली असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाव्यापी दौरे व मेळावे घेण्याचेही या बैठकीत जाहीर करण्यात आले. शहराच्या टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव व राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निर्धार बैठक पार पडली. अजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी राज्य सचिव दिपक गायकवाड, राजाभाऊ कापसे, विभागीय जिल्हाप्रमुख भिमराज बागुल, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुकाध्यक्ष राजु उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा जगताप, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, महिला जिल्हाध्यक्ष जयाताई गायकवाड, कविता नेटके, विनोद भिंगारदिवे, मंगेश मोकळ, दया गजभिये, आकाश बडेकर, निखिल सुर्यवंशी आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विजय वाकचौरे म्हणाले की, आरपीआयचे राष्ट्रीय नेते ना. रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारुन व एकही जागा न देता, आंबेडकर चळवळीचा अपमान करण्यात आला आहे.

भाजपला सत्तेत आणण्यासाठी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी जनतेचे मोठे योगदान राहिले आहे. या निवडणुकीत त्यांना डावलल्याने कार्यकर्त्यांच्या मनात वेदना आहेत. कार्यकर्ते महायुतीच्या विरोधात बंडाच्या तयारीत असून, त्याची ठिणगी अहमदनगर मधून पडणार आहे. रिपाईच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कोणत्याही बैठक मेळाव्याला जाऊ नये. निर्णय होत नाही तो पर्यंत थांबावे. राजकीय सत्तेत कसा वाटा मिळेल याची बोलणी आवश्यक आहे. ही अस्तित्वाची लढाई असून, दक्षिण व उत्तरेत उमेदवाराशी तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकांत भालेराव म्हणाले की, आरपीआयला लोकसभेची उमेदवारी नाकारून आंबेडकरी चळवळ मोडीत काढण्याचा घाट घातला गेला आहे. आंबेडकरी जनता स्वाभिमानी असून, स्वतः चे अस्तित्व या निवडणुकीत दाखवणार आहे. रिपाईचे उमेदवार निवडून येणार नसले, तरी पाडण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे. सत्तेत सहभागी करून घेतले तरच सन्मानाने काम केले जाणार असल्याचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. राजाभाऊ कापसे यांनी आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा दिला जात नाही, त्यांच्या स्वाभिमानाचा व संयमाचा अंत पाहू नका अशा इशारा दिला. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात महायुतीच्या विरोधात भूमिका मांडून स्वबळाचा नारा दिला. अजय साळवे म्हणाले की, आरपीआयला चर्चेला बोलवले नाही, मात्र मनसेला बोलून वाटाघाटी करण्यात आली. मित्रपक्ष आरपीआयला विसरले असून, जे आरपीआयला गृहीत धरून चालतात त्यांना या निवडणुकीत धडा शिकवला जाणार आहे. नवीन मित्र आले जुने मित्रांना विसरले असल्याचे सांगितले. नगर दक्षिणेतून विजय वाकचौरे व अजय साळवे तर शिर्डीतून भीमा बागुल व दीपक गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे बैठकीत स्पष्ट केले. तर या पार्श्वभूमीवर ११ एप्रिल पासून तालुकास्तरीय मेळाव्यांना प्रारंभ करत असल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित काळे यांनी केले. आभार संजय भैलुमे यांनी मानले.