‘रील’ पेक्षा ‘रियल’मध्ये विकास करणारा खासदारच ‘दिल्ली’ मध्ये पाठवायचा आहे : आमदार संग्राम जगताप

0
90

लोकसभा निवडणुकीनिमित्त सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

नगर – सन २०१९ ची लोकसभा निवडणुक मी पक्ष आणि काकांच्या आदेशाने इच्छा नसताना देखील खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविली. माझा पराभव झाला मात्र शहर विकासासाठी आम्ही दोघे पुन्हा एकत्र आलो आणि शहर विकासाला गती दिली. लोकसभेमध्ये आवाज उठवणारा रियल खासदार आपल्याला पाठवायचा आहे तर रील बनवणारा नव्हे. नगरकरांचे अनेक वर्षाचे उड्डाणपुलाचे स्वप्न आम्ही दोघांनी पूर्ण केले आहे. तसेच शहराच्या विस्तारीकरणासाठी बायपास रस्त्याचे योगदान मोठे ठरणार आहे. पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच होणार असून शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीमागे उभे राहायचे आहे. शहराचे विकासाचे काम सुरू झाले असून ते असेच सुरू राहणार आहे भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्हा मोठा असून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक गावात विकासाची कामे पोहचविले आहे. उद्याचे भवितव्य घडविण्यासाठी सक्षम व्यक्तीच्या हाती जिल्ह्याची सत्ता द्यायची आहे. विकासकामांची चित्रफीत दाखवत जनतेला केवळ विकासासाठी मत देण्याचे आवाहन करत आम्ही विरोध करीत बसलो असतो तर उड्डाणपूल पाहायला मिळाला नसता. आपण केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम करावे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप म्हणाले. लोकसभा निवडणुकीनिमित्त आ. संग्राम जगताप यांच्यावतीने खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. यावेळी माजी आ.अरुण जगताप, गणेश भोसले, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, कुमारसिंह वाकळे, अविनाश घुले, प्रा.माणिकराव विधाते, अरविंद शिंदे, उबेद शेख, बाळासाहेब बारस्कर, प्रकाश भागानगरे, विनीत पाऊलबुद्धे, निखिल वारे, दीपक सूळ, संजय चोपडा, विजय गव्हाळे, ज्ञानदेव पांडुळे, अभिजित खोसे, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, श्रेणिक शिंगवी, विपुल शेटीया, राजेंद्र बोथरा, इंजि. केतन क्षीरसागर, घनश्याम सानप, युवराज शिंदे, अंजली आव्हाड, संजय सपकाळ, साहेबान जहागीरदार आदी उपस्थित होते. आ. संग्राम जगताप म्हणाले की, अजित पवार आणि भाजपची युती असल्याने महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधियाने निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची असून सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. तसेच सुजय विखे आणि आपण जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केला असून लवकरच तो लोकांसमोर आणू, तसेच सदरची निवडणूक देशासाठी असून देशाबरोबर नगरचा निकाल सुद्धा विक्रमी असेल, असे ते म्हणाले.

सुजय विखे पाटील म्हणाले की, मी लोकसभेच्या संसदेमध्ये देशाचे राज्याचे व माझ्या मतदार संघातील जनतेचे प्रश्न इंग्रजी आणि हिंदीतून मांडले आहेत. ते प्रश्न समोरच्या उमेदवाराने एक महिन्यांमध्ये पाठ करून बोलून दाखवले तर मी नगर दक्षिणचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार नाही. अहमदनगर जिल्ह्याला लाभलेला राजकीय सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल तर कोणाच्या हातात सत्ता पाहिजे. देशाचे भवितव्य फक्त नरेंद्र मोदीच आहेत. निवडणुकीची चुरस निर्माण करणारे लोक कोण आहेत याच्या भानगडीत पडू नका. आम्हीच निवडून येणार असून, संग्राम जगताप व माझ्या खिशामध्ये मत देखील ठेवले आहे. आम्ही दोघांनी लोकसभेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवली होती. संग्राम जगताप यांनी मनाचा मोठेपणा दाखवत माझ्यासाठी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. आम्हाला नगर घडवायचे आहे द्वेषाने नाही तर प्रेमाने. माझ्या कुटुंबाची आर्थिक ताकद ही कधीही गरिबांना जाणीव करून दिली नाही. नेहमीच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे कुटुंब गेली ५० वर्षे काम करत आहे. अहमदनगर मनपा हद्दीतील ग्रीन झोन ठेवणार नसून लवकरच येलो झोन करणार आहे. त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे घराचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर अहमदाबाद येथे उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाच्या धर्तीवर नगर शहरामध्ये देखील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक उभे करणार आहे. संग्राम जगताप व मी वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी निवडणूक संपल्यानंतर आम्ही एकत्र येतो व विकासाची रखडलेली कामे पूर्ण करतो. आम्ही दोघांनी शहराचे राजकारण बदलून विकासाचे राजकारण सुरू केले.

पुलाखाली टपर्‍याचे अतिक्रमण होऊ नये यासाठी देशातील पहिला प्रोजेट असा असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शिवसृष्टी पुलाखाली साकारली आहे. त्यामुळे त्यांचा विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरत आहे असे ते म्हणाले. येणार्‍या काळात आ. संग्राम जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून आपण नगर जिल्ह्याचा कायापालट करू. महिलांची सुरक्षा, तरुणांच्या हाताला काम, गरिबांना स्वस्त दरात घरे, वाहतुकीच्या सुविधा अशा विविध विकास कामांच्या बाबतीत आम्ही चर्चा केली असून लवकरच एक आदर्श जिल्हा म्हणून आम्ही दोघे नावारुपास आणू असे आश्वासन देत लोकांच्या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही यामुळे तुम्ही फक्त माझा विकास पाहून मला मतदान करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. कार्यक्रमाला येणे म्हणजे खासदाराचे काम नव्हे, तर माझे काम संसदेमध्ये जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. नगर शहरांमध्ये ३० वर्षानंतर दुसरी एमआयडीसी आणली आहे. देशामधील मोठमोठ्या उद्योजकांच्या गाठीभेटी घेतल्या असून त्याचे फोटो आम्ही हळूहळू सोडतो. ही निवडणूक श्रीमंत गरीबाची नाही तर विकासाची आहे. दिशाभूल करणार्‍याला जनता बळी पडणार नाही. नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे लवकरच सुरू होणार असून पुणे संभाजीनगर, सुरत, चेन्नई महामार्गाचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे नगर शहर हे विकासाचे केंद्र बनेल, असे मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. विकास कामांमध्ये पक्ष राजकारण न आणता विकासाची कामे मार्गी लावली आहे. यामध्ये नागरिकांनी देखील सहकार्य केले आहे. पुढील ४० वर्षांचा विचार करून विकासाची नियोजनबद्ध एक एक टप्पा पूर्ण केला जातो, याचबरोबर नागरिकांच्या सहकार्यातून नगर शहर कचराकुंडी मुक्त केले आहे. आपले शहर स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी आमचे काम सुरू आहे. नियोजनबद्ध विकास आराखड्याचे काम सुरू असून भविष्यकाळात देशात विकसित शहर म्हणून ओळखले जाईल, असे मत आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.