अहमदनगर-दौंड रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलदगतीने करावे अन्यथा ‘रास्ता रोको’ आंदोलन

0
48

नगर – मागील दहा दिवसापासून अहमदनगर दौंड रस्त्यावरील नगर आष्टी रेल्वे लाईन वरून जाणारा उड्डाणपूल त्यावर गर्डर ठेवण्याचे काम चालू असल्यामुळे वाहतुकीला बंद केलेला आहे. मागील दहा दिवसांमध्ये अवघे दोन कॉलमवर गर्डर झाकले गेले आहेत. अजून आठ कॉलम झाकायचे बाकी आहेत जर दहा दिवसांमध्ये दोनच कॉलम झाकले जात असतील, तर अजून दोन महिने हे काम होणार नाही असे चित्र दिसते आहे, हा राज्य महामार्ग आहे आणि येथून प्रचंड ट्रॅफिक असते, मग दोन महिने येथील वाहतूक अशीच बंद करून विस्कळीत ठेवणार आहात का? त्यामुळे सदर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अहमदनगरहून केडगाव सोनेवाडी मार्गे पुन्हा दौंड रस्त्याला लागताना मध्ये अवघा आठ फूट रुंदीचा खड्डेयुक्त रस्ता आहे, त्यावरून दोन गाड्या समोरासमोर आल्यानंतर नीट चालता देखील येत नाही तसेच मध्ये तर २ किलोमीटर अक्षरशः नांगरलेल्या शेताप्रमाणे रस्ता झालेला आहे.

अहमदनगर दौंड रस्त्यावरील वाहतुकीचा व त्याच्या वेळेचा अभ्यास न करता जे नियोजन केले आहे ते अतिशय ढिसाळ नियोजन असून अशा प्रकारे काम होणार असल्यास त्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करू. अहमदनगर शहरामधून जाणारा सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल अतिशय गजबजाट असलेल्या वस्तीतून आणि खूप वाहतूक असलेल्या वस्तीतून जात. असताना देखील कुठलीही अडचण निर्माण न होऊ देता संबंधित कॉन्ट्रॅटरने दिवस रात्र अतिशय कौशल्यपूर्ण अवस्थेमध्ये अतिशय जलद गतीने हा उड्डाणपूल पूर्ण केला होता. आणि त्या तुलनेमध्ये सदर कायनेटिक कंपनी च्या पुढील हा उड्डाणपूल अतिशय छोटा असतांना आणि काम करायला भरपूर मोकळी जागा असताना, मनमानी पद्धतीने वाहतूक पूर्ण बंद करून इतया कासवगतीने ढिसाळ पद्धतीने कसा काय हाताळला जात आहे? याविषयी अभ्यास करून तातडीने हालचाल करावी अन्यथा रस्ता रोको आंदोलन करावी लागेल, असा इशारा जागरुक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी दिला आहे.