राष्ट्रीय महामार्गामुळे शेतीत जाण्यास रस्ताच नसल्याने शेतकरी अडचणीत

0
50

२६ फेब्रुवारी रोजी नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून करणार निषेध

नगर – नालेगाव व नेप्ती, निंबळक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे जमिनीपासून दहा ते पंधरा फूट उंच केलेला आहे. त्यामुळे तिन्ही गावातील शेतकर्‍यांना शेतीमध्ये शेती करण्यासाठी रस्ता नाही. रस्ता नसल्यामुळे शेतकर्‍यांना स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी मोठी अडचण झालेली असून, या प्रकरणात भारतीय राज्य मार्ग प्राधिकरण अहमदनगर यांच्याकडून नालेगाव शिवारातील शेतकर्‍यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध अनेक वेळा तक्रारी करूनदेखील दुर्लक्ष झाले असल्याने या प्रश्नासंदर्भात अनेकदा आंदोलने केली. शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या मात्र त्यांचे डिझाईन चुकीच्या पद्धतीने केल्याने अनेक शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीत जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. वेळोवेळी संबंधित अधिकार्‍यांना निवेदन दिलेले आहे. शेतकर्‍यांनी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण केलेले असुन संबंधित अधिकार्‍यांना वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा केलेली आहे.

परंतु अधिकारी शेतकर्‍यांची अडचण समजून घेण्यास तयार नाही. सरकार शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी कमी पडत असून लोकशाही मार्गाने वेळोवेळी मागणी करूनही अधिकारी शेतकर्‍यांना पर्यायी रस्ता देण्यास तयार नाही. प्राधिकरण अधिकारी डी. एस. झोडगे दिशाभूल करून शेतकर्‍यांना अरेरावीची भाषा करत आहे. त्यामुळे अधिकारी झोडगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे निलंबन करावे तसेच स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी २६ फेब्रुवारीला रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे नगर-कल्याण बायपासवर कांदा मार्केट येथे उड्डाणपूल बाह्यवळण रस्ता उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमास येणार असून, छावा संघटना शेतकर्‍यांसह गनिमी कावा करून काळ्याफिती लावून त्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे यांनी सांगितले.