एमआयडीसी येथील कामगारांचे विविध मागण्यासाठी उपोषण सुरू

0
81

कंपनी व कामगार आयुक्त प्रशासनाच्या दडपशाही व हुकूमशाही विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन : संतोष लांडे

नगर – एमआयडीसी येथील ईटन कंपनीतील कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी कंपनी प्रशासनाकडे अहमदनगर जिल्हा कामगार संघटना पत्र व्यवहार करत आहे, मात्र कंपनी प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही. गेल्या १७ वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतन वाढ करार करण्याबाबत सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, तसेच कंपनी चालूं झाल्यापासून माथाडी कायद्याचे सर्वेक्षण करून कायद्याची अंमलबजावणी करावी, रात्रपाळीला महिला कामगारांना कामासाठी बोलावून घेतले जात असून त्यांना बोलवून घेऊ नये, कमी केलेल्या महिलांना कामावर पुन्हा घेण्यात यावे, कंपनीत महाराष्ट्रातील सण उत्सव, परंपरा. महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी साजरी करण्यास परवानगी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे व पदाधिकारी किरण दाभाडे यांनी दिली यावेळी कामगार संतोष भिंगारदिवे, जुबेर शेख, किरण गुंजाळ, निलेश हिंगे, कामगार प्रतिनिधी महेश चेडे, कासिम शेख, किरण जपे, पमोल पवार, अशोक सांगळे, प्रशांत दराडे, गौतम मेटे तसेच कंपनीच्या वतीने मंगेश चौधरी, सुशील खिलारी, मंगेश सरोदे, मंगेश परदेशी,जयेश सोनवणे, अंकिता पुप्पल, असिफ शहानिदिवाण, अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे सभासद, पदाधिकारी आदी उपस्थित होते संतोष लांडे पुढे म्हणाले की, कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा कामगार संघटना कंपनी प्रशासनाशी वारंवार बोलणी करत असून कंपनीच्या आडमुठेपणामुळे कोणताही प्रश्न मार्गी लागत नाही, कामगार आयुक्तांकडे देखील दाद मागितली मात्र न्याय मिळत नाही कामगारांची अडवणूक केली जाते, कंपनी कडून कामगारांविरुद्ध दडपशाही व हुकूमशाही चालू असून विनाकारण कामगारांना वेगवेगळ्या माध्यमातून सतत त्रास देणे असे प्रकार सुरु असून याबाबत अनेकदा कामगार कार्यालयात तक्रारी केल्या आहे, आम्ही नेहमीच कंपनी व कामगारांच्या हितासाठी काम करत आहे, कंपनी प्रशासनच कामगारांकडून चूक होईल अशी स्थिती निर्माण करत आहे आणि नंतर कामगारांवर कारवाई केली जात आहे, आम्हाला टार्गेट केले जात आहे. तरी आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण केले असून आम्हाला न्याय मिळावी अशी मागणी त्यांनी केली.