स्वायत्त संस्थांचा वापर करून पक्ष फोडण्याची कृती लोकशाहीला घातक : घनश्याम शेलार

0
28

नगर – देशाच्या घटनेप्रमाणे झालेल्या स्वायत्त संस्थाच्या कामात सत्ताधारी पक्षाने हस्तक्षेप करून त्यांच्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर करून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले. बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी मोठ्या कष्टातून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण केले वाढवले त्या पक्षांना फोडून ज्यांनी पक्ष निर्माण केला त्या ठाकरे व पवारांकडून पक्ष व पक्षाचे चिन्ह काढून घेऊन ज्यांचा पक्ष त्यांनाच पक्षातून बेदखल केले. अशा प्रकारचे कृत्य हा लोकशाहीवर मोठा आघात असून अशा कृतीमुळे भविष्यात लोकशाही अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही या बाबीची लोकांच्या मनामध्ये खूप चिड असून आगामी निवडणुकांमध्ये जनता सत्ताधारी पक्ष व फुटीरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा घनाघात नगर मधील पत्रकार परिषदेत बीआरएसचे सुकाणू समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी केला ते पुढे म्हणाले आगामी विधानसभा शंभर टक्के लढविणारच आहे, तसेच जर लोकसभेला भाजप विरोधात सक्षम उमेदवार नसल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यानी सांगितले राज्यात ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, यासारख्या महत्त्वाच्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला, तर शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असून, देशात महागाई, बेरोजगारी निर्माण झाली आहे. शेतीमालाला भाव नाहीत. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड आहे. सत्ताधार्‍यांना सामान्य जनता मतदानातून त्यांची जागा दाखवून देतील. नगर दक्षिणच्या सत्ताधारी खासदारांनीही गतवर्षी अनेक ठिकाणीआरोग्य शिबिरे घेतली परंतु गेल्या पाच वर्षांत त्यांनी एकही शिबिर घेतले नाही. यावरून आरोग्याचा प्रश्न संपला आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. साकळाई पाणी योजनाही रखडली आहे. सकाळाई पाणी योजनेचे सर्वेक्षण झालेले असतानाही गेल्या पाच वर्षांत कोणतेही काम झालेले नाही. श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे हे काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता शेलार म्हणाले, की गत विधानसभा निवडणुकीत नागवडे यांना निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी कारखान्याची अडचण सांगितली होती. आता ते काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले असून, दबावामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असावा, अशी शंका आहे, असेही ते म्हणाले.