सण आणि उत्सवात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतचे जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी

0
78

नगर – ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ चा नियम ५ उपनियम ३ व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर श्रोतागृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज जिल्ह्याच्या महसुल स्थळ सीमेच्या हद्दीत सन २०२४ मधील पुढील कालावधीमध्ये १५ दिवसांसाठी ध्वनी प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांच्या वापरास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी एका आदेशाद्वारे परवानगी दिली आहे. १९ फेब्रुवारी २०२४ शिवजयंती (तारखेनुसार), १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, ८, ११,१२ व १७ सप्टेंबर गणपती उत्सव, १६ सप्टेंबर इद-ए-मिलाद, १० व ११ ऑटोबर नवरात्र उत्सव, १ नोव्हेंबर दिपावली, २५ डिसेंबर ख्रिसमस, ३१ डिसेंबर २०२४ व उर्वरित दोन दिवस शासनाने विहित केलेल्या अटीच्या अधिन राहून आवश्यकतेनुसार परवानगी देता येईल. उत्सव कालावधीमध्ये ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने ध्वनी प्रदूषण नियम २००० मधील नियम ३ व ४ चे पालन करावे तसेच ध्वनी प्रदूषण नियम २००० अंतर्गत स्थापन केलेल्या प्राधिकरणाने त्यांच्याकडे प्राप्त तक्रारींवर उच्च न्यायालयाने १६ ऑगस्ट, २०१६ रोजी दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करावी. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शांतता क्षेत्राची माहिती घेऊन त्या भागाातील ध्वनी मापक सयंत्राद्वारे ध्वनीचे कंट्रोल नमुने घ्यावेत. त्याबाबत पंचनामा व ठाणे दैनंदिनरीमध्ये नोंद घ्यावी. एखाद्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊन आजुबाजुच्या लोकांना व सर्वसामान्यांना त्रास होत आहे अशी तक्रार आल्यास ती लिहून घ्यावी व स्टेशन डायरीला नोंद करुन त्या तक्रारीचा खरे खोटेपणा पहाण्यासाठी घटनास्थळी जावे. घटनास्थळी गेल्यावर दोन पंचाच्या समक्ष ध्वनीची तीव्रता किती आहे याची नोंद घ्यावी. घटनास्थळाचे छायाचित्रण करावे. मोजलेली तीव्रता ही मानद मर्यादेपेक्षा अधिक असल्यास उचित प्राधिकरणाकडे पाठवून द्यावेत. घटनास्थळी जाणार्‍या पोलिस अधिकार्‍याने आपल्या अहवालासोबत चौकशीचे सर्व कागदपत्रे त्वरित पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम २००० मधील तरतुदीप्रमाणे निर्माण करण्यात आलेल्या प्राधिकरणाकडे पाठवून द्यावेत. वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशामधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचार संहितेचा नियमावलीचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.