वकील संघटनेच्या धरणे आंदोलनास मुस्लिम समाजाचा पाठिंबा

0
66

जिल्हा बार असोसिएशनच्या काम बंद आंदोलनास मुस्लिम समाजाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.

नगर – अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने जिल्हा न्यायालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनास मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा देऊन राहुरी येथे झालेल्या वकील दाम्पत्यांचा खून प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला. तर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या वकिलांना समाजात निर्भयपणे काम करण्यासाठी प्रस्तावित वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली. राहुरी येथील वकील दाम्पत्य अ‍ॅड. मनीषा आढाव व अ‍ॅड. राजाराम आढाव यांची क्रूरपणे हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असताना वकिलांमध्ये संतप्त भावना असून, अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. तर हत्या झालेल्या आढाव दाम्पत्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी साहेबान जहागीरदार, मुज्जू शेख, नवेद शेख, खालिद शेख, वहाब सय्यद, सादीक शेख, दानिश शेख, सरफराज खान, समीर खान, शाकिर शेख, शाहनवाज शेख, अल्ताफ शेख, यासर इम्तियाज शेख, अब्दुल खोकर, सनाउल्ला खान, कैफ शेख आदीं उपस्थित होते.