मराठा आरक्षणाचा ‘अध्यादेश’ जारी; सरकारकडून सर्वच मागण्या ‘मान्य’

0
62

मनोज जरांगे पाटलांचा लढा यशस्वी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषण सुटले

मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत अहोरात्र लढा दिलेल्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी बाजी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.२७) वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचत मनोज जरांगे यांना सरकारकडून काढण्यात आलेला जीआर (शासकीय अध्यादेश) सुपूर्द केला. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची गळाभेट घेत पाठ थोपटली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.

मनोज जरांगेंनी इशारा देताच रात्रीत अध्यादेश मागण्यांवर आज रात्रीपर्यंत आरक्षणाबाबतीत आदेश काढावा. अन्यथा, शनिवारी (दि.२७) दुपारी १२ नंतर आझाद मैदानाकडे कूच करू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलकांचा ताफा वाशी, नवी मुंबईत या ठिकाणी थांबला होता. अध्यादेश मिळाला तरी आझाद मैदानाकडे गुलाल उधळण्यासाठी जाणार आणि नाही मिळाल्यास त्याठिकाणीच उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, त्यांनी अध्यादेश मध्यरात्री काढल्यानंतर आझाद मैदानाकडील प्रवास थांबवला आणि आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.

सगेसोयर्‍यांवर सरकारकडून एक पाऊल मागे सरकारने काढलेल्या जीआरमुळे मराठ्यांना आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने पूर्ण झाला असून ५४ लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या वेशीवर वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी (दि.२६) १३ मागण्या करत राज्य सरकारला आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यामध्ये अत्यंत काथ्याकूट झालेल्या सगेसोयरे हा कळीचा मुद्दा होता. या मुद्यावरून सरकारने माघार घेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्या मान्य करत राज्य सरकारने जीआर मध्यरात्रीच काढला. सोबतच नोंदी सापडलेल्यांच्या सगसोयर्‍यांनाही लाभ होणार असल्याने जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आज तुमच्या विजयाचा दिवस : मुख्यमंत्री उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठ्यांनी अनेकांना मोठे केले, मोठमोठी पदे अनेकांना मिळाली. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना, संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती. पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. सरकारने जे निर्णय घेतले त्यामध्ये, कुणबी प्रमाणपत्र देण्याचे शिंदे समितीला मुदतवाढ, प्रमाणपत्र देण्याचे शिबीर घेण्यासाठी अधिसूचना, नोंदी शोधण्यासाठी समिती, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर कायद्याच्या चौकटीत टिकणारे, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, असे मराठा आरक्षण ज्या ओबीसींना सवलती मिळतात, त्या सवलती मराठ्यांना दिल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

समाज म्हणून आपला विषय संपला : जरांगे उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आपला त्यांना विरोध संपला आहे. आपली मागणी मान्य झाली आहे. आपल्याला विरोध करणार्‍यांना आपला विरोध होता. समाज म्हणून आपला विषय संपला आहे. मी मुख्यमंत्री यांच्या हस्ते ज्यूस स्वीकारणार आहे. आपण त्यांच्या हस्ते पत्र स्वीकारणार आहोत. समाजाला मी मायबाप मानले आहे. मी तुम्हाला विचारून निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना बोलवू का? यावर सर्वांनी होकार दिल्याने मी निर्णय घेतला आहे.सर्व खुट्या मी उपटल्या आहेत. मला विजयी सभा प्रचंड मोठी घ्यायची आहे. ती तारीख लवकर घोषित करणार.

मनोज जरांगेंच्या या होत्या प्रमुख मागण्या ५४ लाख नोंदी सापडलेल्या कुटुंबांना प्रमाणपत्र द्यावे, कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणार्‍या कुटुंबाला सरसकट आरक्षण आणि ज्याची नोंद सापडली त्याच्या सग्यासोयर्‍यांनाही प्रमाणपत्र द्यावे अशा तीन मागण्या जरांगे पाटील यांच्या होत्या. त्या मागण्या मान्य करण्यात आल्या.