आई-वडिलांसोबतचे कनेशन सुधारण्याची आवश्यकता

0
94

नगर – आपले आई-वडिलांशी अतुट नाते कायम असले पाहिजे. त्यांच्याजवळ जाऊन घट्ट मिठी मारता येईल असे स्नेहबंध आई-वडिलांशी असले पाहिजेत. आजच्या पिढीने आई-वडिलांसोबतचे कनेशन सुधारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लेखक प्रो.नितीन लाठे (मुंबई) यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या भगवान महावीर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प ’आयुष्याचे गणित’ या विषयावर गुंफताना आनंदधाममध्ये ते बोलत होते.
सौ.मनिषा लोढा व कुंदन कांकरिया यांच्या हस्ते वक्त्यांचा सन्मान करण्यात आला. सरोजताई कटारिया यांनी सूत्रसंचालन केले.

श्री. लाठे पुढे म्हणाले, आपल्याला जन्म देणारी आई प्रेमस्वरूप असते आणि वडिल शक्तिस्वरूप असतात. आईचे प्रेम आणि वडिलांची शक्ती ज्यांच्या सोबत आहे त्यांना जीवनातील आनंद सहजपणे मिळत राहातो. एकत्र कुटूंबाची आपली  परंपरा आहे. अलिकडे  कुटूंब विभक्त झाली तरी वर्षामधून एकदा आपल्या परिवारातील सर्वांना एकत्र आणून देवदर्शन  करावे.  सर्गात रमावे. परिवारासोबतचा आनंद अवर्णनीय असतो जो इतर कोणाच्याही सोबत राहून मिळवता येत
नाही. आपला परिवार आपल्याला आत्मविश्वास देतो. आपलेपणाचे ऋणानुबंध अधिक दृढ करतो. सुखात
सगळेच जवळ येतात. दुःखात आपला परिवारच आपल्या सोबत असतो.
नातेसंबंध चांगले रहाण्यासाठी आपलेपणाने स्तुती करा. आपण कोणाला दुखावले तर लगेच माफी मागा.
आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे ’स्तुती करा’ आणि ’माफी मागा’ हे दोन अ‍ॅप आपल्या जीवनात डाऊनलोड
करून ठेवा. आपले आयुष्य आनंददायी होत असल्याचे अनुभवाल. मीपणा कायम बाजूला ठेवा. आपले जीवन केव्हा
संपणार? हे माहित नसते म्हणून सॉरी-थॅयू लगेच म्हणत जा. आपल्या भावना व्यक्त करायला शिका.
आई-वडिल देवाघरी गेल्यावर मी आई-वडिलांची काळजी घ्यायला हवी होती, असे वाटून पश्चात्ताप यायला
नको. आपल्याला निरपेक्षपणे जीव लावणार्‍या चांगल्या मित्रांच्या संपर्कात रहा. आपला कोठे अपमान झाला. आपण कोठे
हरलो. आपल्या हातून पाप घडले तर हे सांगायला चांगला मित्र सोबत हवाच. स्वतःसाठी वेळ
काढा. देवाच्या इच्छेशिवाय या विश्वातील पानही हलत नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. देवाला केंद्रस्थानी ठेवून आपला धर्म सांभाळत काम करावे. संघर्षाला धीराने सामोरे जावे. आव्हानं स्विकारावीत. सकारात्मक भूमिकेतून सदैव कार्यरत
रहावे. आपला विचार-बोली आणि कृती एकच असावी. जीवन खुप सुंदर आहे. जीवनातील आनंद घेत जगावे,
असे विविध उदाहरणे देत स्लाईड शो आधारे श्री. लाठे यांनी सांगितले. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी
ओम…या भक्तीगातासोबत भजन गात श्री. लाठे यांनी व्याख्यानाचा समारोप केला. संगीताच्या साथीने झालेल्या
भजनावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत चांगलाच ठेका धरला. शहरासह उपनगरातील ज्येष्ठ स्त्री-पुरूष उपस्थित
होते. सिमरन मुनोत यांनी आभार मानले.