नगर जिल्ह्यात गुंडगिरी पद्धतीने पोलिस व महसूल यंत्रणेचा गैरवापर

0
117

खासदार नीलेश लंके यांचा आरोप नगर – गुंडगिरी पध्दतीने पोलीस व महसूल प्रशासनाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरीकांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्याचे काम सत्ताधार्‍यांकडून करण्यात येत
असल्याचे सांगत नगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार नीलेश लंके यांनी
संताप व्यक्त केला. गुंडगिरी पध्दतीने, पोलीस, महसूल प्रशासनाचा वापर करून कोणतीही नोटीस न देता
सकाळी सात वाजता बुर्‍हाणनगर येथील अभिषेक भगत यांचे अडीच ते तीन कोटी रूपयांचे मंगल कार्यालय
उध्वस्त करण्यात आले. त्यानंतर खा. नीलेश लंके यांनी शनिवारी दुपारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेउन राजकीय
आकसातून अशी कारवाई करणार्‍या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर ते
पत्रकारांशी बोलत होते. खा. लंके म्हणाले, जिल्ह्यातील नागरीकांचे म्हणणे ऐकूण न घेता आकसापोटी त्यांचे अतिक्रमण सिध्द करून ते पाडण्याचा कट जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून रचण्यात येत आहे. जो माणूस कायद्याच्या चौकटीत
काम करतो, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात काम करणारे अभिषेक भगत हे बुर्‍हाणनगर येथील देवीचे भक्त
आहेत. तिथे त्यांचा स्वतःचा ले-आउट असताना, सर्व कर भरण्यात आलेले असताना तसेच त्यांनी त्यांच्या
जागेतून ग्रामस्थांसाठी रस्तेही काढून देण्यात आलेले आहेत असे असताना सकाळी गुंडाराज पध्दतीने शंभर
दिडशे पोलीस तसेच काही गुंड प्रवृत्तीचे लोकही तोंड बांधून त्या ठिकाणी आले व सर्व जमीनदोस्त करण्यात
आल्याचे लंके यांनी सांगितले. एकीकडे आम्ही हिंदुत्वाचे काम करतो हे सांगायचे आणि दुसरीकडे २१०० वर्षांपूर्वीच्या पालखीची तोडफोड करायची असा सत्तेचा गैरवापर करण्यात येत असून त्यासंदर्भात आपण जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून
तक्रार केल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई झाली पाहिजे

नगर शहरातही महापालिका आयुक्तांकडून
चुकीच्या कारवाया करण्यात येत आहेत. लोकांकडे उतारे असतानाही त्यांचे म्हणणे एकूण न घेता गाळे
जमीनदोस्त करण्यात आले. ज्या अधिकार्‍यांनी राजकीय आकसापोटी या कारवाया केल्या आहेत त्यांच्यावर
कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खा. लंके यांनी केली.

विरोधकांना टार्गेट केले जात आहे

ज्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणूकीत सत्ताधार्‍यांचे काम केले नाही अशा लोकांना ठरवून टार्गेट केले जात आहे. त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता त्यास त्रास दिला जात आहे. त्यांचे राहते घर, व्यवसायाचे ठिकाण जमीनदोस्त करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबले नाहीत तर आम्हाला ठोस पाउले उचलावी लागणार आहेत. वेगळ्या पध्दतीने समाजाला
वेठीस धरले जाणार असेल तर त्यांना धडा शिकविण्याची ताकद आमच्यात आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीला प्रखर विरोध करतील.

तर आयुक्तांना पळता भुई थोडी होईल महानगरपालिकेतील कारनामे बाहेर काढलेतर आयुक्तांना पळता भुई थोडी होईल. महापालिका व महसूल प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने कारवाई
करू नये. अधिकार्‍यांना फोन केल्यावर ते आमच्यावर दबाव असल्याचे सांगतात. अधिकार्‍यांवर दबाव आहे म्हणून तुम्ही लोकांना उध्वस्त करणार का? असा सवाल लंके यांनी केला.

जल जीवन मिशनमध्ये मोठा घोटाळा
ठराविक अधिकार्‍याला एखाद्या पदावर बसविण्याचा घाट घातला जातो कारण त्यामागे आर्थिक
हितसबंध असतात. जल जीवन मिशनच्या कामातील भ्रष्टाचारावर आपण आवाज उठविला आहे. त्याचे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन भ्रष्टाचाराचे पुरावे, व्हिडीओ सादर केले आहेत.
आएएस दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची आपण मागणी केली
आहे. हा नगर जिल्ह्यातील घोटाळा नसून राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. एखादी पाणी योजना
झाल्यानंतर पुन्हा तीस वर्षे पाणी योजनेसाठी निधी मंजुर होत नाही. कागदोपत्री किंवा निकृष्ट दर्जाच्या या योजना
होणार असतील, अर्धा फुटांवर पाईप गाडले जाणार असतील, ज्या कंपनीचे पाईप घेण्यासाठी मान्यता नाही
त्या कंपनीचे पाईप टाकले जाणार असतील, योजना पुर्णत्वास जाणार नसेल तर हे सर्व काही चुकीचे आहे.