अहिल्यानगर दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘भारतीय जैन संघटना’ योगदान देणार

0
107

नगर – राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने यावर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण
व रूंदीकरण योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. भारतीय जैन संघटना याकामी योगदान देणार असून अहिल्यानगर जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात येणार आहे. यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आढावा घेतला. ५ एप्रिलपर्यंत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी पी.बी.गायसमुद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी दिघे, जलसंधारण अधिकारी शिवम डापकर, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, बीजेएसचे अहिल्यानगर अध्यक्ष प्रशांत गांधी, अशोक पवार, मनसुखलाल चोरडिया, विश्वजीत गुगळे, संजय शिंगवी, अमोल पटवा, दर्शन गांधी, आनंद भंडारी, नरेश सुराणा, नयन पोखर्णा, संतोष गंगवाल, प्रसाद शहा, आदिनाथ पवार आदी उपस्थित होते.

आदेश चंगेडिया यांनी सांगितले की, जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील ३६८ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून सर्व गावांचे प्रस्ताव मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरु करण्यात
येणार आहे. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने दुष्काळमुक्त
महाराष्ट्रासाठी सातत्याने योगदान दिले आहे. आताही अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळमुक्तीसाठी भारतीय जैन
संघटना सक्रिय सहभाग नोंदवणार आहे. तलावातील गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे.
त्यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही स्वयंसेवी संस्था किंवा ग्रामपंचायतीला
अर्ज करून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पध्दतीनुसार काम करता येईल. तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प, अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, दिव्यांग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून
निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे.
शासनाच्या या योजनेची गावागावात जागृती करणे, शेतकर्‍यांना गाळ नेण्यासाठी प्रोत्साहित करणे, मागणी अर्ज
तसेच गाळमुक्त धरण हे टेनॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सरपंचांनी आपल्या गावांचा मागणी अर्ज बीजेएस डिमांड पवर ऑनलाईन भरावा. बीजेएसचे जिल्हा प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाशी सहयोग करण्यास
सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी तलावातील गाळ काढण्यासाठी, नाला खोलीकरणय्रूंदीकरणासाठी त्वरित अर्ज भरून द्यावेत असे आवाहन जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी www.shiwaar.com या वेबसाईटवर संपर्क साधावा.