अॅलर्जी म्हणजे काय?
कोणाला कशाचे वावडे असते, तर कोणाला कशाचे. अॅलर्जी हा याचाच एक समानार्थी शब्द म्हणावा लागेल. अनेक स्त्रिया कुंकू लावतात; पण एखादीलाच त्यामुळे कपाळावर पुरळ येते, खाज येते. काँग्रेस गवताला अनेकजण हात लावतात; पण एखाद्यालाच त्वचेवर काळे चट्टे, खाज अशी लक्षणे दिसून येतात. यावरून एक लक्षात येईल की, अॅलर्जी ही व्यक्तीविशिष्ट आहे. धुळीत काम केल्यावर काहीजणांना खूप शिंका येतात, काहींना दम्याचा त्रास होतो; बर्याच लोकांवर मात्र काहीच दुष्परिणाम होत नाही. अॅलर्जी करणारे पदार्थ शरीरात गेल्यानंतर शरीरातील पेशी त्यांच्याविरुद्ध प्रतिद्रव्ये तयार करतात. लस दिल्यानंतर याच प्रक्रियेतून रोग प्रतिबंधक प्रतिद्रव्ये वा अँटीबॉडीज् तयार होतात.
अॅलर्जीत चुकीच्या प्रतिसादामुळे विपरीत परिणाम घडवून आणणार्या अँटीबॉडीज् तयार होतात. या अँटीबॉडीज्च्या परिणामामुळे हिस्टामीन, संथगतीने क्रिया करणारा ‘अ’ पदार्थ अशा घटकांची निर्मिती होते. या घटकांच्या परिणामामुळे छोट्या श्वासनलिकांचे स्नायू आकुंचन पावतात. रक्तवाहिन्या रुंदावून रक्तदाब कमी होतो. याखेरीज पूरळ येणे, खाज येणे अशी स्थानिक लक्षणेही दिसतात. रुग्णाला चक्कर येते. श्वास घ्यायला त्रास होतो. गंभीर प्रकारच्या अॅलर्जीमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. हे टाळण्यासाठी कोणत्या पदार्थाची अॅलर्जी आहे ते शोधून त्याचे डिसेन्सेटायझेशन करता येते.