घनकचरा व्यवस्थापन कर मनपाने त्वरित रद्द करावा अन्यथा आंदोलन

0
56

नगर – घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करण्यात यावा व सर्वसाधारण मालमत्ता करांमध्ये जून पर्यंत १० टक्के सूट मिळवी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने महापालिका आयुत डॉ. पंकज जावळे यांना देण्यात आले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी आयुक्तांशी चर्चा केली. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, गिरिष जाधव, योगिराज गाडे, संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, परेश लोखंडे, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, संजय आव्हाड, पप्पू भाले, विशाल वालकर, प्रशांत पाटील, सुरेश क्षीरसागर आदि उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मनपाने चालु वर्षाच्या घरपट्टी बीलांमध्ये अवाजवी वाढीव घनकचरा व्यवस्थापन कर दुपटीने वाढविण्यात आला असून, निवासी वापरासाठी पूर्वी २४० रु. होता तो आता ४८० करण्यात आला आहे. तसेच व्यावसायिकांसाठी हा कर पूर्वी १२०० रु. होता तो आता २४०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढीव कर आकारणी सर्वसामान्य, व्यापारी व दुकानदार यांना न परवडणारी व अन्यायकारक आहे. ती त्वरीत रद्द करावी व पुर्वीप्रमाणे कर आकारणी करावी. शहरातील छोटे दुकानदार व मोठे व्यापारी यांना घनकचरा व्यवस्थापन कर सरसकट एकसारखा आकारण्यात आल्यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच कमी जागेत रहात असलेल्या रहिवासी व मोठ्या जागेत रहात असलेले रहिवासी यांना सुद्धा सरसकट एकसारखा कर आकारण्यात आला आहे. त्यामुळे गरीब जनतेत चिड निर्माण झाली आहे. तरी ही कर आकारणी चटई क्षेत्रफळाने व्हायला हवी, यापुर्वी व्यापार्‍यांनी वेळोवेळी याबाबतचे निवेदन दिलेले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १४० अन्वये मालमत्ता कराची रक्कम आगाऊ भरण्यातून सुट देण्यात येत असते.

दरवर्षी एप्रिलमध्ये १० टक्के व मे आणि जून करीता ८ टक्के सुट देण्याची तरतुद आहे. वास्तविक पाहता मनपाची मालमत्ता कराची बीले चालू वेळेस एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजे उशिरा मिळाली आहेत. यावर्षी एप्रिल व मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका तसेच कडकडीत उन्हाळा तसेच जून महिन्यात सर्वसामान्य नागरिकांना शैक्षणिक खर्चाची वैयक्तिक तरतुद करावी लागत असल्याने सर्वसाधारण मालमत्ता करामध्ये १० टक्के सूट देण्यात यावी व वाढीव घनकचरा कर रद्द करण्यात यावा, अन्यथा नागरिकांसमवेत जनआंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी भगवान फुलसौंदर म्हणाले, सध्या मनपात प्रशासन राज सुरु आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनाने यंदाच्यावर्षी सर्वसाधारण कर तसेच घनकचरा करामध्ये केलेली वाढ ही अन्यायकरक आहे. एकदम दुप्पट झाल्याने नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत प्रशासनने फेर विचार करुन ही दरवाढ कमी करावी, तसेच पट्टी भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आहे. अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही श्री.फुलसौंदर म्हणाले. यावेळी संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांनी विविध विषयावर चर्चा केली.