जिल्हा रुग्णालयातील गैरसोई व अडचणी दूर न झाल्यास १२ फेब्रुवारीपासून उपोषण

0
70

नगर – जिल्हा रुग्णालयातील गैरसोय व अडचणी दूर करण्यात याव्यात अन्यथा १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्या पासून बेमुदत उपोषणा करण्याचा इशारा भारतीय जनसंवाद तर्फे देण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा रुग्णालयामध्ये येणार्‍या गरीब रुग्णांना व त्यांचे नातेवाईकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो. विशेषतः रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची योग्य व्यवस्था नाही. एस्प्रेस फिडरचे बिल भरत नसल्यामुळे वीजेच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होवून तातडीच्या आरोग्य सुविधा पुरविण्यात मोठ्या अडचणी येतात. अशा अनेक प्रशासकीय गैरसोयीमुळे योग्य सक्षम अशी आरोग्य सुविधा गरीब नागरिकांना उपलब्ध होत नाही. याकरिता जिल्हा रुग्णालयातील अडचणी व गैरसोयी दूर व्हाव्या यासाठी आपले समोर मांडत आहे. मागण्या पुढीलप्रमाणे १. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पडिक असलेली धर्मशाळा दुरुस्ती करुन रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्यासाठी योग्य ती सोय करण्यात यावी. २. जिल्हा रुग्णालयामधील Express Fider  यांचे थकीत बिल भरुन जिल्हा रुग्णालय भारनियमातून मुक्त करण्यात यावे. ३. बाहेर असलेला नेत्रकक्ष विभाग हे जिल्हा रुग्णालयाचे आतमध्ये ओ.पी.डी. नंबर २४, २५, २६ यांच्या शेजारी घेण्यात यावी. ४. डॉटरांच्या ओ.पी.डी. मध्ये बंद असलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तातडीने चालू करावेत व त्याची स्क्रिन हे आर. एम. ओ. च्या नंबर २७ या ओ.पी.डी. मध्ये बसविण्यात यावे. ५. प्रत्येक ओ.पी.डी.मध्ये सर्व डॉटर हे सकाळी ८.३० ते १२.३० वाजेपर्यंत पूर्ण वेळ उपस्थित असावेत व सर्व डॉटरांनी अ‍ॅप्रन घालुन डयुटी करावी. ६. सिव्हील सर्जन यांची पूर्वीप्रमाणे जी आतमध्ये बसण्याची जागा होती ती जागा पुन्हा त्याच ठिकाणी करण्यात यावी. उदा. पूर्वी बसण्याची जागा ही दार उघडल्यावर समोर होती. परंतु ती आता दाराच्या आडोशाला घेतल्यामुळे तिथे येणार्‍या लोकांना सिव्हील सर्जन आतमध्ये आहेत की नाही हे कळत नाही. ७. मुख्य गेटजवळील खराब झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा. वरील सर्व अडचणी व गैरसोयी आपले स्तरावर दूर होणार्‍या आहेत. कदाचित आपल्यापर्यंत या अडचणी गैरसोयी पोहोचल्या नसतील. आपण त्वरीत या अडचणी व गैरसोयी दूर कराव्यात. अन्यथा नाईलाजाने आपले कार्यालयापुढे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजलेपासून उपोषण सत्याग्रह आंदोलन करावे लागेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, अशोक सब्बन, बबलू खोसला यांनी दिला.