वातावरणातील आर्द्रतेचा आरोग्यावर काही परिणाम होतो का?

0
52

वातावरणातील आर्द्रतेचा आरोग्यावर काही परिणाम होतो का?


आपल्या वातावरणात थोडेफार बाष्प असतेच. मुंबईचे हवामान दमट तर मराठवाडा-विदर्भात ते कोरडे-रखरखीत असते. मुंबईच्या दमट हवामानात सारखा घाम येतो, तर रखरखीत वातावरणात त्वचा कोरडी पडते. वातावरणातील आर्द्रतेचा आरोग्यावर बराच प्रभाव पडतो. हवामानातील आर्द्रता ६५% हून अधिक जास्त वाढली तर हवा ओलसर, चिकट
भासायला लागते व आपण अस्वस्थ होतो. दमा वगैरे श्वसनाचे विकार असणार्‍या लोकांना श्वसनात अडचणी येऊ शकतात. हवामानातील आर्द्रता ३०% हून अधिक कमी झाल्यास हवा कोरडी, रखरखीत वाटायला लागते. श्वास घेताना नाकात कोरडेपणा वाटायला जाणवतो. कालांतराने नाकातील श्लेष्मल आवरणाला इजा होते. जंतूसंसर्गही होऊ शकतो घसा बसणे, खोकला ही लक्षणेही निर्माण होतात. आपल्या लक्षात येईल की, हवेत योग्य त्या प्रमाणात आर्द्रता असेल तरच आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच एखादे ठिकाण वातानुकूलित करताना हवेच्या तापमानाबरोबरच हवेतील आर्द्रतेचेही संतुलन राखले जाते.