नगर – अहमदनगर शहरामध्ये व उपनगर परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशाने व शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली विद्युत महावितरण कार्यालयात गॅस बत्ती व मेणबत्ती पेटून आंदोलन करण्यात आले होते. शहरामध्ये गेले कित्येक दिवसापासून शहर व उपनगरामध्ये नागरिकांना तथा आपल्या ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वारंवार वीज खंडित केली जाते. नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात असून नागरिक हैराण झाले आहे त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी व तक्रार निवारण केंद्रातील कर्मचारी हे फोन उचलत नाही. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण होत नसून योग्य ते उपाययोजना करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिले होते. कर्मचारी अधिकारी फोन उचलत नसून ग्राहकांच्या तक्रारीचे देखील निवारण होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्युत महावितरणाचे कार्यकारी अभियंता मंगेश साळुंके यांना स्मरण पत्र देण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक शहर जिल्हा कार्याध्यक्ष जॉय लोखंडे, प्रा. माणिक विधाते, मयूर बांगरे, वैभव ढाकणे, संतोष लांडे, परेश पुरोहित, दीपक लिपाने, शिवम भंडारी, संतोष भिंगारदिवे, भारत गारुडकर, धनंजय चव्हाण आदी सह पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात दिलेल्या मागण्या मान्य न झाल्यास आ. संग्राम जगताप यांच्या आदेशाने व शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर, अल्पसंख्याक शहर जिल्हा कार्याध्यक्ष जॉय लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले