डोक्यात गोळी घालून एकाचा खून; मृतदेह थेट वारणा नदीकाठी फेकला

0
77

नगर – हॉटेलचे सामान खरेदीच्या बहाण्याने मित्राला कारमध्ये बसवून नगरला आणले आणि शेंडी बायपास रोडच्या कडेला कार थांबवून अज्ञात कारणातून त्याच्या डोयात गावठी कट्ट्यातून गोळी मारून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह थेट सांगली जिल्ह्यात नेवून वारणा नदीच्या काठावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. भाऊसाहेब रामदास पवार (वय ३२, रा.मोरया चिंचोरे, ता. नेवासा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून गोरख अशोक माळी व रविंद्र किसन माळी (दोघे रा. रा.मोरया चिंचोरे ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील रविंद्र माळी याला पोलिसांनी अटक केली असून गोळी मारणारा मुख्य आरोपी गोरख माळी हा फरार आहे. मयत व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी असून एकमेकांचे मित्र आहेत. यातील आरोपी गोरख माळी याचे हॉटेल असून त्या हॉटेलचे सामान खरेदी करण्यासाठी तिघे जण मारुती ईर्टीगा कारने ८ जून रोजी दुपारी नगरला आले होते. सायंकाळी ५ नंतर एमआयडीसी जवळील दुध डेअरी चौकातून गोरख माळी याने कार शेंडी बायपास रस्त्याने नेली. निर्मनुष्य ठिकाण पाहून रस्त्याच्या कडेला कार उभी केली. त्यानंतर कारच्या शीटखाली लपवून ठेवलेला गावठी कट्टा काढुन अज्ञात कारणातून भाऊसाहेब पवार याच्या डोयात गोळी घातली. त्यामुळे भाऊसाहेब हा जागीच खाली कोसळून मयत झाला. त्यानंतर या आरोपींनी त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी थेट सांगली जिल्ह्यात कुरळप पोलीस स्टेशन हद्दीत वारणा नदीचे काठी नेवून फेकुन दिला. कुरळप पोलिसांना अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी त्याचा तपास सुरु केल्यावर सदर मृतदेह हा भाऊसाहेब पवार याचा असल्याचे समोर आले. त्याच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधल्यावर नातेवाईक तेथे गेले असता त्यांनी मृतदेह ओळखला. त्यामुळे मयताचा मावसभाऊ आण्णा वसंत पवार (वय ४५, रा.मोरया चिंचोरे, ता. नेवासा, सध्या रा.आनंदधाम रोड, शिंदे हॉस्पीटल शेजारी, साई अपार्टमेंट, अहमदनगर) याच्या फिर्यादी वरून कुरळप पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरु केल्यावर मयत भाऊसाहेब हा गोरख माळी व रविंद्र माळी यांच्या बरोबर नगरला आला होता. तेव्हापासून तो बेपत्ता असल्याची बाब समोर आली. कुरळप पोलिसांनी नगर पोलिसांच्या मदतीने आरोपींचा शोध घेत त्यातील रविंद्र माळी याला पकडले. त्याच्याकडून या हत्याकांडाचा उलगडला झाला. सदर गुन्हा हा एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने तो शनिवारी (दि.१५) एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस या हत्याकांडातील मुख्य आरोपी गोरख माळी याचा शोध घेत असून त्याला पकडल्यावरच या हत्याकांडाचे कारण समोर येणार आहे.