विखेंवर नाराज असलेल्या भाजपाच्या लोकांनी निवडणुकीत निलेश लंके यांना मोठी मदत केली

0
107

दोन नंबरच्या पिपाणी चिन्हाला मिळालेली ४४ हजार मते ही लंके यांचीच मते खाण्याचा डाव विरोधकांनी आखला; महाविकास आघाडी नेत्यांचा आरोप

नगर – गेल्या पन्नास वर्षाची परंपरा सांगणार्‍यांची काय अवस्था झाली हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले आहे. विखेंवर नाराज असलेल्या भाजपाच्या लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केली. सर्वसामान्य व्यक्तीचे दिवस आल्यावर काय होते हे नगरच्या लागलेल्या निकालातून सिद्ध होते. यांच्याकडे जर नैतिकता असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे येथील भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले. निलेश लंके हे विजयी झाल्यानंतर आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक बाबर, किसनराव लोटके, हाजी शौकत तांबोळी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण काळे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, बाळासाहेब हराळ, अभिषेक कळमकर, अथर खान आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले की, या निवडणुकीमध्ये उमेदवार जास्त होते.

त्यामुळे दोन ईव्हीएम मशीन वापरण्यात आल्या या ठिकाणी दुसर्‍या दोन नंबरला पिपाणी असणारे चिन्ह कशा पद्धतीने येईल असे बघितले गेले जो माणूस त्या चिन्हावर उभा राहिला त्याला नगरमध्ये फारसे कुणी ओळखते नसेल अशा माणसाला ४४००० मते पडली ती मते निलेश लंके यांचीच मते आहेत एक प्रकारे समाजामध्ये अशा प्रकारचे कृत्य करण्याचा डाव कुणी आखला याबद्दल सुद्धा आता आम्ही त्याचा विषय घेत आहोत असे त्यांनी सांगितले या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगले वाईट अनुभव आले मात्र आमच्यामध्ये एकता होती महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा हे पदाधिकारी पासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी ते मान्य केले म्हणूनच एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला पण दुसरीकडे ज्यांचा पराभव झाला त्यांना तो पराभव स्वीकारता येईल का हा खरा प्रश्न असल्याचे फाळके यांनी सांगितले. निवडणूक झाल्यानंतर त्यांनी लहान मोठ्या कार्यकर्त्यांवर कारवाईची सुरुवात केली. सुपा या ठिकाणी अतिक्रमण त्यांनी काढली त्या अतिक्रमणाला आमचा विरोध नाही पण सूडबुद्धीने त्यांनी अतिक्रमण काढले याला आमचा विरोध असल्याचेही ते म्हणाले. आमचा कार्यकर्ता झुकला नाही असे फाळके यांनी सांगितले. यश पचवण्याची ताकद आमच्याकडे आहे मात्र पराभव पचवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे का असा सवाल त्यांनी केला .काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी मदत केली व त्यांचे नेतृत्व सर्वांनी मान्य केले तसेच विखे यांना कंटाळून जे कुणी भाजपचे पदाधिकारी होते त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली असे फाळके यांनी सांगितले. साम दाम दंडाचा अवलंब त्यांनी केला पण त्यांना यश मिळवता आले नाही. आज जसे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले ते उदाहरण ताजे आहे. त्यामुळे येथील सुद्धा पदाधिकार्‍यांनी नैतिक अधिष्ठान समजून निर्णय घ्यावा असा टोलाही त्यांनी यावेळी पालकमंत्री यांचे नाव न घेता लावला आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातले आमदार नवनिर्वाचित खासदार व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत १० जूनला होणार असल्याचे सांगितले.

या मेळाव्यात विजयोत्सव आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल मार्गदर्शनही केले जाणार आहे. यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे म्हणाले की, दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे एकंदरीत या निवडणुकीम ध्ये पक्ष फोडण्याचा राग जनतेच्या मनामध्ये होता तसेच राज्यांमध्ये जे महाविकास आघाडीचे चांगले सरकार काम करत होते ते पाडण्याचा डाव या भाजपवाल्यांनी केला या निवडणुकीमध्ये भाजपाने २३ जागा लढवल्या त्यातील केवळ ९ जागा यांना मिळाल्या दोन्ही पक्ष फोडून भाजपाचे खासदार पडले यासारखी शोकांतिका नाही. असा आरोप गाडे यांनी केला. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये पालकमंत्र्यांसह केंद्र व राज्य सरकार कमी पडले. ही या निवडणुकीत महत्त्वाची ठरली. नगर शहरांमध्ये याच पालकमंत्री विखे यांनी कर्डीले, कोतकर, जगताप यांची साथ घेतली त्यांना सुद्धा आता काय निकाल लागला ते आता भोगावे लागेल. आगामी काळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये १२ ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील याचे नियोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ म्हणाले की, आम्हाला यश आले आमचा एकही कार्यकर्ता पदाधिकारी हा फुटलेला नाही त्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्यामुळे हा विजय आम्हाला साध्य करता आला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली व त्यामध्ये जनतेने लंके यांना कौल दिला ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे. या निवडणुकीमध्ये कांदा, दूध, यासारखे अनेक प्रश्न होते शेतकर्‍यांच्या बाजूने सरकारने काहीच उपायोजना केल्या नाही म्हणून जनतेमध्ये तीव्र संताप होता. यावेळी विक्रम राठोड, संभाजी कदम, शौकत तांबोळी किरण काळे आदींची भाषणे झाली.