शहरातून जाणारी अवजड वाहने रात्रीच्या वेळी अडवली : पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केली अटक

0
88

अवजड वाहनांच्या अपघातात अनेकांचा जीव जात असताना वाहतूक पोलीसांनी ठोस भूमिका घ्यावी

शहरातून जाणारी अवजड वाहने पोलिस अधीक्षक चौकात रात्रीच्या वेळी अडविण्यात आली. यावेळी पोलिसांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक केली.

रात्री शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबत नसल्याने राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.८ जानेवारी) रात्री डीएसपी चौकात रस्त्यावर उतरुन अवजड वाहने थांबवली. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात शहरात आलेली अवजड वाहने थांबवून पुन्हा बाह्यवळण रस्त्याने वळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अर्धा ते पाऊणतास चाललेल्या या आंदोलन स्थळी तोफखाना पोलीसांनी येऊन राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केली. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश शिंदे, केतन ढवण, गौरव हरबा, प्रवक्ते किरण घुले, शिवम कराळे, ओंकार मिसाळ, हृषीकेश जगताप, तन्वीर मणियार, कृष्णा शेळके, कुणाल ससाणे, ओंकार म्हसे, श्रावण जाधव, किशोर थोरात, अभिजीत साठे, शुभम जोशी, आर्यन शेख, अनिल भोसले, स्वप्नील कांबळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनेक दिवसांपासून रात्री शहरातील अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत आहे. अवजड वाहनांमुळे यापूर्वी अनेक नागरिक व युवकांचा जीव गेलेला असताना देखील शहरातून अवजड वाहतुक सर्रास सुरु आहे. बाह्यवळ रस्त्याची व्यवस्था उपलब्ध असूनही रात्री अवजड वाहने शहरात घुसत आहे.

ज्येष्ठ नागरिक व महिला यांना रात्रीच्या वेळी वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असल्याचे आंदोलकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबविण्यासाठी दोन दिवसापूर्वी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या प्रश्नावर पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्याने राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातून जाणारी अवजड वाहने अडवली. रात्री १० नंतर मोठ्या प्रमाणात शहरात अवजड वाहने येत असल्याने अनेक अपघात होऊन अनेकांचा जीव जात आहे. वाहतूक पोलीस यासंदर्भात ठोस भूमिका घेत नाही. पोलीसांना सहकार्य करुन हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन स्थळीच अवजड वाहनांमुळे दोन गंभीर अपघात होताना वाचले. रात्रीची शहरातून होणारी अवजड वाहतुक थांबवावी. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले, असे इंजि. केतन क्षीरसागर यांनी म्हटले आहे.